आयएमडीचा अलर्ट | संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सक्रिय
मुंबई | नगर सह्याद्री
गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून अखेर संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे. गेल्या आठवड्यात ढगांची पुरेशी निर्मिती न झाल्यामुळे पावसाने ओढ दिली होती, मात्र आता कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील बहुतांश भागांत मोठ्या प्रमाणावर ढग दाटून आले असून ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाचे पुणे प्रमुख एस. डी. सानप यांनी आगामी 4 ते 5 दिवस राज्यात चांगल्या पावसाचे असणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
आगामी काळात तूट भरून निघेल
आयएमडी प्रमुख एस. डी. सानप यांनी सांगितले की, मान्सून राज्यात पूर्णपणे सक्रिय झाल्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. परिणामी वेगवान ढग निर्मिती होऊन पाऊस पडत आहे. यंदा मान्सून राज्यात दाखल होण्यास उशीर झाला होता. त्यातच जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस न झाल्याने गेल्या दोन दिवसांपर्यंत पावसात तब्बल 72 टक्के तूट नोंदवली गेली होती. मात्र, येणाऱ्या 5 दिवसांत ही संपूर्ण तूट भरून निघेल, असा विश्वास हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
अहिल्यानगरसह ‘या’ जिल्ह्यांना चार दिवस यलो अलर्ट
पुढील चार दिवस भारतीय हवामान खात्याने राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे यलो अलर्ट जाहीर केला आहे. तर पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर येथे ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. इतर जिल्ह्यात ग्रीन अलर्ट सांगितला आहे.
शुक्रवार, शनिवार, रविवारी कुठे पडणार पाऊस
शुक्रवारी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, अहिल्यानगर, बीड, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली येथे यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. शनिवारी ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली येथे यलो अलर्ट जाहीर केला आहे. सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तर रविवारी मुंबई, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.










