दोन दिवसांत प्रश्न सोडविण्याचे प्रशासनाचे आश्वासन
पारनेर/ नगर सह्याद्री :
तालुक्यातील ग्रामीण भागात महावितरणकडून सुरू असलेल्या रात्रीच्या भारनियमनामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांनी सोमवारी दि २९ जून रोजी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन ग्रामीण भागातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली. यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी दोन दिवसांत वीज प्रश्न पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती झावरे पाटील यांनी दिली.
झावरे म्हणाले की, यापूर्वी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत भारनियमन होत होते. मात्र आता अनेक गावांमध्ये थेट रात्री १ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित ठेवला जात आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत असून लहान मुले, वृद्ध, महिला तसेच शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. रात्रीच्या अंधारामुळे ग्रामीण भागात सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला असून चोरीच्या घटना वाढण्याची तसेच विषारी प्राण्यांचा धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे रात्रीचे भारनियमन तात्काळ बंद करून नियमित वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी झावरे पाटील यांनी केली.
या विषयाची गांभीर्याने दखल घेत कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन दोन दिवसांत परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन दिले. मात्र दिलेल्या मुदतीत वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही, तर जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सुजित झावरे पाटील यांनी महावितरण प्रशासनाला दिला.










