नेवासा | नगर सह्याद्री
नेवासा तालुक्यात अग्नीशस्त्रासह खुनाचा प्रयत्न, दरोडे, मारहाण, धमक्या अशा गंभीर गुन्ह्यांद्वारे दहशत निर्माण करणार्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या टोळीतील तीन जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, टोळी प्रमुख शुभम विश्वास उर्फ विश्वनाथ गर्जे (वय २९, रा. वड्डुले) याच्यासह आकाश उर्फ दत्ता सावंत (वय २७, रा. चिलेखणवाडी) आणि योगेश मच्छिंद्र सावंत (वय १८) यांनी एक संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून नेवासा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते.या टोळीवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी, गुंगीकारक पदार्थांची विक्री, तसेच अग्नीशस्त्र बाळगणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०१७ ते २०२५ या कालावधीत या टोळीने सातत्याने गुन्हे केले असून, यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नव्हती.
टोळीच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक पुढे येऊन तक्रार करण्यास घाबरत होते. भविष्यात गंभीर गुन्हे टाळण्यासाठी ही टोळी विखुरणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी नमूद केले.नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अंतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांनी चौकशी करून अहवाल दिल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या तिघांना अहिल्यानगर जिल्ह्यातून ३ महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी अशा टोळ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.










