वनविभागाची तातडीची कारवाई; ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील लोणी मावळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडत वनविभागाचे आभार व्यक्त केले आहेत.
लोणी मावळा गावालगतच्या मावळे मळा, खैरे मळा परिसरातील तळ्याजवळ बिबट्याचा सातत्याने वावर आढळून येत होता. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाने तातडीने हालचाल करत गावातील माजी उपसरपंच बाळासाहेब खैरे यांच्या घराजवळील उसाच्या शेताच्या बांधावर पिंजरा उभारला. काही दिवस बिबट्याने पिंजऱ्याकडे दुर्लक्ष केले. मात्र भक्षाच्या शोधात फिरत असताना रविवारी पहाटे तो पिंजऱ्यात अडकला.
याची माहिती माजी उपसरपंच बाळासाहेब खैरे यांनी तत्काळ वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी धाडे, वनपाल भालेकर, वनरक्षक भोसले तसेच कर्मचारी परवेज शेख, विठ्ठल वाढवणे, सातपुते, मुश्ताक शेख आणि लोणी मावळा येथील वनमित्र देवराज शेंडकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पिंजऱ्यात बिबट्या सुरक्षितरित्या अडकल्याची खात्री करून पुढील कार्यवाही करण्यात आली.बिबट्या जेरबंद झाल्याने लोणी मावळा परिसरातील भीतीचे वातावरण निवळले असून ग्रामस्थांनी वनविभागाच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले आहे.










