मुंबई / नगर सह्याद्री –
रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अशोक खरात प्रकरणानंतर वाढलेल्या वादामुळे गेल्या काही दिवसांपासून चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती.
अखेर काल रात्री रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यानंतर त्यांनी माध्यामांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“माध्यमांकडून दाखवले जाणारे व्हिडीओ हे काही वर्षांपूर्वीचे आहेत. गुरुपौर्णिमोच्यानिमित्ताने पाद्यपूजा अनेकांनी केली, तशी मी आणि माझ्या पतीनेही केली. खरात पती-पत्नीला मी आणि माझ्या परिवाराने गुरु मानलं होतं. तिथे होणाऱ्या कार्यक्रमांना आम्ही उपस्थित राहायचो. यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानलं, त्यानिमित्ताने आम्ही कुटुंब उपस्थित राहत होतो.
पाच-सहा वर्षांपूर्वी आपण ज्या व्यक्तीच्या संपर्कात असतो, ते पाच-सहा वर्षांनी एखाद्याचे कृत्य, वैयक्तिक वागणूक, वैयक्तिक आयुष्य याबद्दल आपल्याला सुतराम कल्पना नसते. आज जे आपल्यासोबत आहेत, ते उद्या पुढे जाऊन कसं वागतील, ही कल्पना आपल्या कोणाला नसते. त्यामुळे मी ही घटना समजल्यावर मला धक्का बसला,” असे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.
“मी लगेच ट्विटही केलं. या देवस्थान ट्रस्टशी माझ्या कुटुंबाचा संबंध आहे. शिवनिका संस्थानमध्ये मी प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हापासून सदस्य म्हणून ट्रस्टवर काम केले आहे. माझ्यासमवेत समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर या ट्रस्टवर होते. मी ट्रस्टची सदस्य होते, त्यानंतर मी महिला आयोगाची अध्यक्ष झाले. या ट्रस्टचा कार्यकाळ 8 ऑगस्ट 2025 रोजी संपुष्टात आला होता.
माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायातील आहे. आमची खरातवर असणारी श्रद्धा अध्यात्मिक दृष्टीकोनातून होती. त्यामुळे खरातच्या ट्रस्टसोबत जोडले गेले. परंतु, खरातची दुसरी बाजू मला माहिती नव्हती. जे काही कृत्य घडलंय ते अत्यंत चुकीचं आहे, घाणेरडं असून त्याचं आम्ही कुठेही समर्थन करणार नाही. पोलिसांनी त्याचा तपास करुन आरोपीवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणीही यावेळी चाकणकरांनी केली.
माझ्यासारख्या अनेक लोकांचे फोटो खरातसोबत आहेत. परंतु एक महिला म्हणून माझ्यावर आरोप करण्यात आले याचं वाईट वाटतं, अशी खंत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.
सुषमा अंधारेंच्या आरोपांवर चाकणकरांचे प्रत्युत्तर
दुसरीकडे, खरात याच्या सांगण्यावरुन राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोमवती अमावस्येला स्वत:च्या हाताचे बोट (अनामिका) कापून घेतली होती, असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. या आरोपांनाही रुपाली चाकणकर यांनी कालच्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
“काहीजणांनी पत्रकार परिषद घेऊन सातत्याने चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला. कोणीतरी सांगितलं, 2 सप्टेंबरचा फोटो आहे. माझा हा फोटो 12 सप्टेंबरचा आहे. त्या फोटोवरील 1 अंक खोडून 2 सप्टेंबर तारीख दाखवली. त्यादिवशी अमावस्या-पोर्णिमा आहे, असे चुकीचे सांगितले. माझ्या अकाऊंटवर आजही गेलात तरी हे फोटो आहेत, ते 2 सप्टेंबरचे नाही, तर 12 सप्टेंबरचे आहेत.
2 सप्टेंबरला मी आदरणीय अजितदादांच्या दौऱ्यात होते. तेव्हा माझ्या हाताला कुठेही जखम नव्हती. 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबरलाही मी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये होते, 5 सप्टेंबरलाही माझ्या हाताला कुठेही जखम नाही. कायद्याच्या चौकटीतून आम्ही या सगळ्यांना नोटिसा पाठवू,” असा इशाराही रुपाली चाकणकरांनी दिला.










