नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
कॉक्रोच जनता पार्टीने नीट पेपर फुटीचा मुद्दा उचलून धरत दिल्लीतल्या जंतर-मंतर या ठिकाणी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही पाठिंबा दिला आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १९ वा दिवस आहे. या आंदोलनाला विविध कलाकारांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. अशातच कॉमेडियन कुणाल कामराही सोनम वांगचुक यांच्यासाठी मैदानात उतरला आहे.
देशाचे आणखी दुसरे गांधी उपोषणाला बसलेत आणि गोडसेवादी..
माझं विद्यार्थ्यांना सांगणं आहे की तुम्हाला जर कुणी मोदी समर्थक किंवा भाजपाचा मतदार भेटला तर त्याच्याशी अगदी सहजपणे बोला, वाद घालू नका. आपल्याला रोग्याचा नाही तर रोगाचा इलाज करायचा आहे. मोदींनी केलं तर योग्य केलं असं ते म्हणत असतील तर तुमचा वेळ वाया घालवू नका तिथून निघून जा. या सरकारला कुठलीही लाज वाटत नाही. सोनम वांगचुक यांच्या रुपाने आपल्या देशातले आणखी एक गांधी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. गोडसेवादी लोकांना काही फरक पडत नाही, त्यांना कसली चिंताच नाही. तुम्ही विद्यार्थी आहात, काही शेतकरी आहेत, काही बेरोजगार आहेत. मी तुम्हा सगळ्यांच्या वतीने भारताच्या सरन्यायाधीशांचे आभार मानतो कारण त्यांनी हे आंदोलन सुरु करण्यासाठीची पहिली वीट ठेवली. असं म्हणत कुणाल कामराने सरन्यायाधीशांनाही टोला लगावला आहे.
धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागणार-कुणाल कामरा
कुणाल कामरा म्हणाला अनेक लोक बेरोजगार आहेत. ते तरुण रोज काय करायचं या विचारांनी त्रस्त आहेत. घर कसं चालवायचं, आपलं पुढे काय होणार हे प्रश्न त्या तरुणांपुढे आहेत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागणार आहेत. शिवाय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. त्यांना थोडी लाज वाटत असती तर त्यांनी राजीनामा एव्हाना दिलाही असता. कदाचित धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायचाही आहे पण मोदी त्यांना म्हणाले असतील की तुम्ही राजीनामा दिलात तर माझी ५६ इंची छाती ५२ इंचांची होईल त्यामुळे राजीनामा देऊ नका. राजीनामा तर तुम्हाला द्यायचाच आहे. एक परीक्षाही या लोकांना नीट घेता येत नाही, असं कुणाल कामराने म्हटलं आहे.
सगळ्यांनीच अभिजित दीपके आणि सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला पाहिजे-कुणाल कामरा
पेपर लीक वर बोलायचं म्हणजे जिथे पेपर सेट केला जातो तिथूनच लिक केला जातोय. तो प्रिंटिंग प्रेसपर्यंत तर पोहचू द्या, त्याआधीच तुम्ही लिक करत आहात. कुणी विकतंय, कुणी खरेदी करतं आहे. पेपर लिक झाल्याने जो पास होईल तो कुणाची मदत करणार आहे? हे लोक पुढची ४० वर्षे यंत्रणेत राहू शकतात अशी स्थिती आहे. यांची यंत्रणाच अशा प्रकारे आतून पोखरली गेली आहे हे लोक कशा प्रकारचा देश तयार करणार आहेत? असाही सवाल कुणाल कामराने विचारला आहे. आपला देश सोनम वांगचुक यांच्यासह, अभिजीत दीपकेंसह यांच्या पाठिशी उभा राहिला पाहिजे याबाबत काहीही शंका नाही. आज विद्यार्थ्यांच्या प्रश्न आहे. उद्या शेतकऱ्यांचा प्रश्नही हाती घेणार आहोत. आपल्या देशातली माध्यमं काहीही करत नाही. त्यामुळे आपल्याला प्रश्न विचारावे लागत आहेत असंही कुणाल कामराने म्हटलं आहे.












