सायकलवरून जनगणना करत शिक्षक अमोल शिंदे यांनी जपला आदर्श
पारनेर | नगर सह्याद्री
आजच्या काळात वेग, सुविधा आणि दिखावूपणाच्या स्पर्धेत माणूस पर्यावरण, आरोग्य आणि सामाजिक जबाबदारी विसरत चालला असताना, श्री राघवेंद्रस्वामी विद्यानिकेतन बोल्हेगाव अहिल्यानगर येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अमोल शिंदे यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण उभे केले आहे. केंद्र सरकारच्या जनगणना मोहिमेचे काम त्यांनी पूर्णपणे सायकलवरून पार पाडत इंधन बचत हीच खरी देशसेवा हा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवला आहे.
शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षण देतानाच अमोल शिंदे हे अर्थशास्त्र विषयात पीएच.डीचे संशोधनही करत आहेत.अभ्यास, अध्यापन आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर समतोल साधत त्यांनी जनगणना मोहिमेत सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देताना त्यांनी कोणत्याही मोटार वाहनाचा वापर न करता सायकलची निवड केली.
जनगणना म्हणजे केवळ माहिती संकलनाचे काम नसून, नागरिकांशी संवाद साधत शासन आणि समाज यांच्यातील दुवा मजबूत करण्याची प्रक्रिया असते. उन्हाचा तडाखा, सततचा प्रवास, दुर्गम भागातील फेरफटका आणि वेळेचे बंधन या सर्व अडचणी असूनही अमोल शिंदे यांनी चेहऱ्यावर हास्य ठेवत सायकलवरून हे काम पूर्ण केले. त्यांच्या या कृतीने अनेकांना आश्चर्याचा धक्का तर दिलाच, पण त्याचबरोबर प्रेरणाही दिली.
घराघरात जनगणनेसाठी पोहोचणाऱ्या या शिक्षकाकडे नागरिकांनी केवळ कर्मचारी म्हणून पाहिले नाही, तर सामाजिक जाणीव जपणारा जबाबदार नागरिक म्हणून त्यांचे स्वागत केले. सरकारी काम करताना इतक्या प्रामाणिकपणे पर्यावरणाचा विचार करणारे व्यक्तिमत्त्व दुर्मिळ आहे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.अर्थशास्त्र विषयात पीएचडी करत असताना संसाधनांची बचत, शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यावर अभ्यास करणारे अमोल शिंदे यांनी हे विचार केवळ पुस्तकापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनात उतरवले आहेत. त्यामुळे त्यांचे कार्य अधिक प्रभावी आणि प्रेरणादायी ठरत आहे.
आज सोशल मीडियावर त्यांच्या सायकलवरील जनगणनेची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असून, तरुण वर्ग, विद्याथ आणि शिक्षक वर्गातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देश बदलायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करा, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.सायकलवरील त्यांचा हा प्रवास केवळ जनगणनेपुरता मर्यादित नसून, तो समाजाला सकारात्मक दिशेने नेणारा एक प्रेरणादायी संदेश बनला आहे.










