सरकारचे आश्वासन फसले; कृषिमंत्र्यांकडून आता नवी डेडलाईन
मुंबई | नगर सह्याद्री
कर्जमाफीची वाट पाहून असलेल्या लाखो शेतकरी कर्जमाफी केव्हा होतेय. पैसे खात्यावर केव्हा येतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा केली होती, मात्र आता सरकारची ही डेडलाईन हुकली आहे. आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीसाठी नवी तारीख जाहीर केली आहे. विधानसभेत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्पावेळी पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे. तसेच 30 जूनपर्यंत कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु आता 30 जूनचा मुहूर्त हुकला आहे.
राज्यपालांच्या सहीचे कारण देत प्रत्यक्ष अंमलबजावणीला वेळ लागणार असल्याची ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी विधानसभेत दिली. शेतकरी कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना 5 जुलैपासून मिळेल, अशाही महत्वपूर्ण महितीही त्यांनी यावेळी दिली.
पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. या योजनेसाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यात देखील आणखी 3 हजार कोटी रुपयांची तरतुद केली जाणार असल्याची माहितीही भरणे यांनी दिली आहे.तसेच कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तरतुदीला विधिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर ती राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येईल. त्यावर स्वाक्षरी झाल्यावर निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री म्हणालेत. यानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ 5 जुलैपासून मिळेल. एकीकडे कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. यामुळे जूनअखेर कर्जमाफी देण्याचा सरकारचा वादा फसला आहे.
कर्जमाफीच्या प्राथमिक अंदाजानुसार 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यासाठी 36 हजार 585 कोटी रुपयांची रक्कम लागणार आहे. तर योजनेतील अटी, सुधारणावरून सरकारला विरोधकांनी धारेवर धरल्यानंतर त्यात बदल करण्यासंदर्भात उपसमिती सकारात्मक निर्णय घेणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितले आहे, असे कृषिमंत्री भरणे म्हणाले.सरकारचे तारीखचं नाटक ः राजू शेट्टीसरकारच्या चाल ढकलीमुळे शेतकरी अडचणीत येत आहे. यावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारचा जोरदार हल्लाबोल चढवला आहे. कर्जमाफीवरुन सरकारचं टाईमपास सुरू आहे. पुढची तारीख सांगितली जात आहे, याचा अर्थ तारीख पे तारीखचे नाटक सरकारकडून सुरू असल्याचं शेट्टी म्हणालेत.










