मुंबई | नगर सह्याद्री –
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी आंदोलकांची तुलना थेट ‘आतंकवाद्यां’शी करत, सरकारने या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने सडेतोड उत्तर द्यावे, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आणि आंदोलकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
ते म्हणाले की, ” आंदोलनात मोठे षड्यंत्र असून, सरकारने दोषींना पकडत चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींना सोडले जाणार नाही. जे विद्यार्थी ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, ते प्रवेशासाठी धावपळ करत आहेत. मात्र, ज्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही, ते केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांचा थेट संबंध नाही, त्यामुळे सरकारने त्यांचा राजीनामा मुळीच घेऊ नये”, असे खोत यांनी म्हटले.
तसेच “इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी केंद्र व राज्य सरकारविरोधात सातत्याने खोटे बोलून अपप्रचार करत आहेत आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या आघाड्या आंदोलनाशी संबंध नसल्याचा दावा करत असल्या, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक ग्रूप चालवणारा ट्रोल आणि ‘आय लव्ह जयंत पाटील’ हे पेज या आंदोलनात तेल ओतण्याचे आणि वातावरण बिघडवण्याचे काम करत असल्याचा आरोपही खोत यांनी केला.
दरम्यान, विरोधक आणि आंदोलक हे देशात आतंकवादासारखी परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत, त्यामुळे या ‘आतंकवाद्यांना’ सरकारने लोकशाहीच्या मार्गाने चोख उत्तर दिले पाहिजे, असेही खोत म्हणाले. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.










