वन विभागाची युद्धपातळीवर शोधमोहीम
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
तालुक्यातील वडघुल परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीला वाडी-वस्त्यांपुरता मर्यादित असलेला बिबट्या आता थेट गावात प्रवेश करत असून, कोंबड्या व लहान पाळीव जनावरांवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रोज सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या दरम्यान गावातील विविध भागात बिबट्याचे दर्शन होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत गावातील एका घराजवळ झाडावर बसलेल्या कोंबड्यांवर झडप घालण्यासाठी बिबट्याने थेट अंगणात उडी घेतली. यावेळी घरातील एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव थोडक्यात बचावला. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.
प्रादेशिक वन अधिकारी दिपाली भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी दिलीप केदारे व अशोक आरडे हे गावात भेटी देत नागरिकांना बिबट्यापासून बचावासाठी आवश्यक खबरदारीची माहिती देत आहेत. बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. दरम्यान, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून युद्धपातळीवर मोहीम राबविण्यात येत असून अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत आहेत. लवकरच बिबट्याला पकडण्यात यश मिळेल, असा विश्वास वन विभागाने व्यक्त केला आहे.यासंदर्भात सरपंच राम घोडके यांनी ग्रामस्थांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.










