एमआयडीसी, उड्डाणपूल, वीज, कर्जमाफीसह विकासाचा आराखडा जाहीर
राहुरी | नगर सह्याद्री
राहुरीतील उड्डाणपूल, एसटी डेपो यांसारख्या प्रलंबित प्रश्नांसाठी राज्याच्या तिजोरीचा कोरा धनादेश मी अक्षय कर्डिले यांना देत आहे. त्यांनी मांडलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील. तसेच कृषी विद्यापीठाच्या अतिरिक्त १००० एकर जागेवर एमआयडीसी उभारून मोठ्या प्रमाणात उद्योग आणण्याचा मानस व्यक्त करत जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देत बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी येथेे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी विधानपरिषद सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरणमंत्री पकंजा मुंडे, आमदार मोनिका राजळे, आ.संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे पाटील, आ. विठ्ठलराव लंघे, आ.प्रसाद लाड, आ.अमोल खताळ, आ. काशिनाथ दाते, महापौर ज्योतीताई गाडे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नगराध्यक्षा सत्यजित कदम पाटील, अलका कर्डिले, उमेदवार अक्षय कर्डिले आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्व. कर्डिले यांच्या अपूर्ण राहिलेल्या विकासस्वप्नांची पूर्तता करण्याची जबाबदारी स्वतः घेत असल्याची ठाम ग्वाही दिली. ही निवडणूक केवळ राजकीय नसून भावनिक आहे. अक्षय कर्डिले यांचा विजय म्हणजे स्व. कर्डिले साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले. उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वडिलांचे अपूर्ण राहिलेले विकासस्वप्न पूर्ण करण्यासाठी मला संधी द्या. शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत त्यांच्या वारशाला न्याय देईन.पालकमंत्र विखे पाटील म्हणाले, अक्षय कर्डिले यांना ऐतिहासिक विजय मिळवून देणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल. समाजातील सर्व घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत असून विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनीही विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षय कर्डिले यांना पूर्ण ताकद द्या, असे आवाहन केले. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा देत अक्षय कर्डिलेच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन केले. या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.










