गैरकारभारामुळे चिमुकलीचा बळी | खा. लंकेंच्या आंदोलनाने परिसर दणादला
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महावितरणाच्या गैरकारभारामुळे चिमुकलीचा बळी गेल्याचा आरोप करत खासदार निलेश लंके यांनी महावितरण कार्यालयाविरोधात बुधवारी आंदोलन केले. तसेच महावितरण कार्यालयाला टाळे ठोकत निषेध व्यक्त केला.
महावितरणच्या कथित निष्काळजी व जनविरोधी कारभारामुळे नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी येत्या 8 जुलै रोजी अहिल्यानगर येथील महावितरण कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन केले. आंदोलनापूव महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देऊन खा. लंके यांनी सर्व प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी केली होती. आंदोलनाद्वारे अघोषित लोडशेडिंग तातडीने बंद करणे, जळालेल्या डीपी कालबद्ध पद्धतीने बदलणे, स्मार्ट मीटर व वाढीव वीजबिलांची उच्चस्तरीय चौकशी करणे, स्मार्ट मीटर सक्तीचे न ठेवणे, अतिवृष्टीग्रस्त वीज पायाभूत सुविधांची त्वरित दुरुस्ती, सोलर व नेट मीटरिंगची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढणे, तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करून निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करणे आणि कृषी वीजजोडणीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करणे, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन रॅलीला सुरुवात झाली. महावितरण कार्यालयाला टाळे ठोकत तीव्र निषेध नोंदवला. यावेळी आंदोलन कर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात नगरसेवक योगीराज गाडे, रामेश्वर निमसे, शेतकऱ्यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










