मारहाण, जबरी चोरी व धमकीप्रकरणी आरोपींवर तात्काळ कारवाईची मागणी
पारनेर/ नगर सह्याद्री :
पोखरी (ता. पारनेर) येथील रावसाहेब कुंडलीक पवार यांनी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवार (दि. २९ जून) रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय, पोखरी येथे कुटुंबीयांसह आमरण उपोषणास सुरुवात केली.
रावसाहेब पवार यांनी दिलेल्या निवेदनानुसार, दि. २९ मे २०२६ रोजी गावठाण गट क्रमांक १९ मधील जागेच्या वादातून त्यांच्या भावावर शिवम महादू पवार, प्रवीण विठ्ठल पवार, अक्षय महादू पवार, राजू बन्सी पवार, अमोल बन्सी पवार, मंदाबाई महादू पवार व अलका विठ्ठल पवार यांनी संगनमताने जीवघेणा हल्ला केला. या मारहाणीत त्यांच्या भावाच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले.
याच घटनेत त्यांच्या भावाच्या पत्नीचे मंगळसूत्र हिसकावून नेण्यात आले, तसेच भावाच्या खिशातील १८ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शिवाय, संबंधित आरोपींकडून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून जबाब नोंदविण्यात आला असला, तरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा असूनही संबंधित आरोपींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप रावसाहेब पवार यांनी केला आहे. आरोपींना राजकीय पाठबळ असल्यामुळे कारवाई टाळली जात असल्याचा आरोपही त्यांनी निवेदनातून केला आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब भीतीच्या वातावरणात जीवन जगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व न्याय मिळावा या उद्देशाने रावसाहेब पवार यांच्यासह संतोष पवार, सार्थक पवार, रोहिणी पवार, सविता पवार आणि मीरा पवार हे कुटुंबीयही आमरण उपोषणात सहभागी झाले आहेत.
उपोषणकर्त्यांनी संबंधित सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, जबरी चोरी, मंगळसूत्र हिसकावणे व जीवे मारण्याच्या धमकीसंदर्भातील सर्व लागू कलमांचा समावेश करून निष्पक्ष तपास करावा, तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करावा, तसेच कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत.
दरम्यान, मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे.










