दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची खा. नीलेश लंके यांची मागणी / लोणीव्यंकनाथ प्रकरणात श्रीगोंदा पोलिसांकडे तक्रार / वैद्यकीय अधिकारी, प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
लोणीव्यंकनाथ येथील आनंदी अनिल कांडेकर व विरा प्रविण कांडेकर या दोन चिमुरड्यांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध करून न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि अन्य जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली आहे. याबाबत त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दिला आहे.
रविवारी खासदार लंके यांनी लोणीव्यंकनाथ येथे जाऊन कांडेकर कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी थेट श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठून वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शैला डांगे तसेच या प्रकरणातील इतर जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी बाबासाहेब भोस, बाळासाहेब नाहाटा, टिळक भोस, स्मितल वाबळे, प्रा. संजय लाकुडझोडे, सतीश बोरुडे, बाळासाहेब जठार आणि झहीर जकाते उपस्थित होते.
या प्रकरणाबाबत खासदार लंके यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी बाबासाहेब नागरगोजे आणि पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नाराजी व्यक्त केली. लोणीव्यंकनाथ येथील घटनेची न्याय्य पद्धतीने हाताळणी न करता दूषित हेतूने कारवाई झाल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासनाकडून उपलब्ध असलेली वैद्यकीय सेवा या निष्पाप चिमुरड्यांना दिली नाही. इतकेच नव्हे तर या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून आंदोलकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले. एखादा गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलीस अनेक बाजूंचा विचार करतात; मात्र या प्रकरणात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी रात्री उशिरापर्यंत थांबून गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आंदोलनस्थळी जाऊन प्रथम आंदोलकांच्या भावना समजून घेणे आवश्यक होते. पोलीस अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली किंवा हातचे बाहुले बनून काम न करता निष्पक्षपणे कर्तव्य पार पाडावे. आंदोलकांना लक्ष्य करण्याच्या भावनेतून कारवाई होणे लोकशाहीसाठी योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून डॉ. प्रशांत मुळे आणि डॉ. शैला डांगे यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणीही खासदार लंके यांनी केली.
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर चिमुरड्यांना वेळेत वैद्यकीय सेवा का मिळाली नाही, याची वस्तुस्थिती जाणून न घेता बेजबाबदार विधाने केल्याचा आरोपही त्यांनी केला. शासनाच्या १०२ रुग्णवाहिका सेवेसंदर्भातील परिपत्रक, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची नकारात्मक भूमिका आणि त्यातून दोन निष्पाप चिमुरड्यांचा झालेला मृत्यू हा अत्यंत गंभीर विषय असून हा संपूर्ण मुद्दा संसदेत मांडणार असल्याचेही खासदार नीलेश लंके यांनी यावेळी जाहीर केले.










