मुंबईसह कोकण, पुणे भागात इशारा | विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम
मुंबई | नगर सह्याद्री
राज्यात तापमानात वाढ झालेली असतानाच काल पासून पुन्हा पावसाने हजेरी लावली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे. मुंबईत गुरुवार सकाळपासून पावसाची रिमझिम सुरु आहे.
पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन ते चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागांवर होत असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवस राज्यातील विविध भागांत ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी कायम राहण्याची शक्यता आहे.
सातारा, सोलापूर, धाराशिवमध्ये यलो अलर्ट ; अहिल्यानगरमध्ये हलक्या सरी
आयएमडीने सातारा, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून काही ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो. याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांतही विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.










