सुनील चोभे / नगर सह्याद्री
राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी व निकष तातडीने रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकरी वारकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाबा महाराज झेंडे यांनी दिला आहे.
सरकारने कर्जमाफीची घोषणा करताच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यानंतर जाहीर झालेल्या अटी-शर्ती पाहता “कर्जमाफी देतो” असे सांगून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना लाभापासून दूर ठेवण्याचा डाव रचला गेल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. अनेक निकष इतके कठीण आहेत की ९९ टक्के शेतकरी त्यामध्ये बसत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामीण भागातून उमटत आहे.
अतिवृष्टी, दुष्काळ, वाढलेले खत-बियाण्यांचे दर, महागडी कीटकनाशके, वाढलेले पशुखाद्य खर्च, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल भाव यामुळे शेतकरी आधीच आर्थिक खाईत लोटला गेला आहे. अशा परिस्थितीत दिलासा देण्याऐवजी सरकारने अटींचे जाळे विणून शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप झेंडे यांनी केला.
“रस्त्यांवर हजारो कोटींची कामे करण्यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी निधी नाही, हे कोणते धोरण?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जलजीवन मिशनसारख्या योजनांमध्ये शेकडो कोटी रुपये खर्च होऊनही अनेक प्रकल्प अपयशी ठरत असताना शेतकऱ्यांना मदत देताना सरकार हात आखडता का घेत आहे, असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला.
कर्जमाफीच्या अंमलबजावणीत अन्याय झाल्यास न्यायालयीन लढाई लढण्याचाही इशारा संघटनेने दिला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करता काही मोजक्या लोकांनी तयार केलेली कर्जमाफी योजना महाराष्ट्रातील शेतकरी स्वीकारणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
२० जूनला चिखली टोलनाक्यावर रास्ता रोको
शेतकरी वारकरी संघटनेच्या वतीने २० जून रोजी सकाळी ९ वाजता चिखली टोलनाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर २२ जून रोजी कोळगाव येथेही मोठे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनांचा एकमेव मुद्दा शेतकरी कर्जमाफी असून सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. “जय जवान, जय किसान! देशाचे रक्षण जवान करतात आणि देशाला जगवण्याचे काम शेतकरी करतो. त्यामुळे आता जवान आणि किसान एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध लढा उभारतील,” असा निर्धारही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.










