ग्रामसभेच्या ठरावावर प्रश्नचिन्ह; जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे मागणीचे निवेदन सादर
पारनेर | नगर सह्याद्री
टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 962 मधील जागा कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेरच्या उपबाजारासाठी देण्याच्या प्रस्तावाला आता तीव्र विरोध सुरू झाला आहे. गावचे माजी सरपंच शिवाजी सिताराम खिलारी यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे निवेदन देत संबंधित ठराव रद्द करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत बापूसाहेब रांधवण, सामाजिक कार्यकर्ते गणेश चव्हाण उपस्थित होते. याबाबत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून ग्रामस्थांच्या भावना डावलल्याचा आरोप केला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेरने यापूव टाकळी ढोकेश्वर येथील गट क्रमांक 842/1 मधील जागा खरेदी केली होती. मात्र त्यानंतर काही संचालकांनी संगनमताने ती जागा विकल्याने आज त्या ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्याच्या मोबदल्यात समितीला गट क्रमांक 164 मध्ये कल्याण रोडलगत जमीन देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.असे असताना ग्रामपंचायतीने गट क्रमांक 962 मधील जागा उपबाजारासाठी देण्याचा ठराव केल्याबाबत त्यांनी आक्षेप घेतला आहे. 29 मे 2023 रोजी झालेल्या ग्रामसभेत या संदर्भातील ठराव मांडण्यात आला होता. मात्र त्याच ग्रामसभेत मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांनी सदर जागा कृषी उत्पन्न बाजार समितीला देऊ नये, असा विरोधी ठरावही मंजूर केल्याचा दावा खिलारी यांनी केला आहे.
ग्रामसभेत झालेल्या विरोधाकडे दुर्लक्ष करून तत्कालीन सरपंचांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला जागा देण्याचा ठराव पाठविला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हा ठराव वस्तुस्थितीला धरून नसून ग्रामस्थांच्या इच्छेविरुद्ध असल्याने तो तात्काळ रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याशिवाय, कृषी उत्पन्न बाजार समितीकडे उपबाजारासाठी स्वतःची जागा उपलब्ध असताना ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा देण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. गट क्रमांक 962 मधील कोणतीही जागा समितीला देण्यात आल्यास गावातील नागरिक तीव्र आंदोलन छेडतील, तसेच रस्त्यावर उतरून उपोषण करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे टाकळी ढोकेश्वरमध्ये राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहे. प्रशासन या निवेदनावर कोणती भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी माजी सरपंच शिवाजी खिलारी यांनी केली आहे.
गावहिताच्या दृष्टीने ठराव तात्काळ रद्द करा
ग्रामसभेतील अनेक ग्रामस्थांनी गट क्रमांक 962 मधील जागा कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यास स्पष्ट विरोध दर्शविला होता. तरीही ग्रामस्थांच्या भावना डावलून ठराव पुढे पाठविण्यात आला. गावच्या हिताच्या दृष्टीने हा ठराव तत्काळ रद्द करावा, अन्यथा ग्रामस्थांना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारावे लागेल.
-शिवाजी खिलारी, माजी सरपंच, टाकळी ढोकेश्वर










