पुणे / नगर सह्याद्री –
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली होती. मात्र आता बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. पुढील काही दिवस हा जोर कायम राहणार आहे. आज सकाळपासून मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाची सुरुवात झाली आहे. या पावसामुळे लोकलसेवा धिम्यागतीने धावत आहे. कोकण पट्टा, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून २० जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो. उर्वरित राज्यात मात्र ऊन आणि ढगांचा लपंडाव सुरू राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडू शकतात. हवामानातील या बदलामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबईत पावसाने रविवार पासून दमदार सुरुवात केली. आज सकाळी देखील पावसाने जोर धरला असून मुंबईला यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. दरम्यान सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे लोकल उशिराने धावत आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेची लोकल १५ ते २० मिनिटांनी उशिराने धावत आहे, तर हार्बर मार्गावर लोकल सेवा १० मिनिटे उशिराने आहेत.










