पारनेर | नगर सह्याद्री
तालुयातील वीज पुरवठ्याच्या लपंडावामुळे नागरिक मेटाकुटीला आले असून, या प्रश्नावर शिवसेना नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्री अंधार अशा दुहेरी संकटामुळे जनतेचा संयम सुटत चालला असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
गेल्या काही दिवसांपासून पारनेर तालुयात सायंकाळी ६ ते १० या वेळेत दररोज वीज खंडित केली जात आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत विजेअभावी नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असून, मुलांचे शिक्षण, महिलांची घरगुती कामे आणि शेतकर्यांच्या दूध काढण्याच्या वेळा विस्कळीत झाल्या आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत झावरे पाटील यांनी थेट अहमदनगर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली.
यावेळी त्यांनी कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांची भेट घेऊन तालुयातील जनतेच्या तीव्र भावना त्यांच्यासमोर मांडल्या. दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्री अंधार अशा दुहेरी संकटामुळे जनतेचा संयम सुटत चालला असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. किमान घरगुती वापरासाठी लागणारी सिंगल फेज वीज तरी सुरू ठेवावी, जेणेकरून सर्वसामान्यांचे हाल होणार नाहीत, असा पवित्रा त्यांनी घेतला. या चर्चेदरम्यान त्यांनी अधिकार्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले की, जर वीज पुरवठ्याचे वेळापत्रक तातडीने बदलले नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. या आक्रमक पवित्र्यानंतर कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी आज किंवा उद्यापासूनच वेळापत्रकात बदल करून दिलासा देण्याचे आश्वासन दिले आहे.
रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार
पारनेरमधील जनता उन्हाचा कडाका आणि रात्रीच्या अंधारामुळे त्रस्त आहे. सायंकाळच्या वेळी वीज गायब असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून महिला व शेतकर्यांचे हाल होत आहेत. महावितरणने तातडीने सिंगल फेज वीज सुरू ठेवून वेळापत्रकात बदल करावा. जर प्रशासनाने जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहिला, तर आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र लोकआंदोलन छेडण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, याची नोंद घ्यावी.
– सुजित झावरे पाटील, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद










