राजेश वराळ यांचा प्रामाणिकपणा, चेअरमन गीतांजली शेळके यांनी केला सत्कार
पारनेर | नगर सह्याद्री
जी.एस. महानगर बँकेच्या शिरुर शाखेतील ग्राहक छाया बाळासाहेब शेळके यांचे बँकेत राहिलेले 9 तोळे सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल बँकेत कार्यरत असलेले कर्मचारी राजेश रामचंद्र वराळ यांचा बँकेच्या चेअरमन गीतांजली शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
छाया शेळके या जी.एस.महानगर बँकेच्या शाखेत नेहमीप्रमाणे लॉकरची चौकशी करण्यासाठी आल्या होत्या. मात्र लॉकर ऑपरेट केल्यानंतर त्यांचे नऊ तोळ्याचे दागिने मात्र नकळत खाली पडले. त्या लॉकर बंद केल्यानंतर निघून गेल्या. त्यानंतर वराळ हे लॉकर रुममध्ये कामानिमित्त गेले असता हे दागिणे खाली पडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वराळ यांनी हे दागिने घेऊन तातडीने शाखाधिकारी बाबाजी लामखडे यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. छाया शेळके या लॉकर रुममध्ये गेल्याचे लामखडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने शेळके यांना बँकेत पुन्हा बोलावून घेऊन लॉकरची पुन्हा तपासणी करण्याची सूचना केली. यावेळी मात्र दागिने नाहीत हे त्यांच्या लक्षात आल्याने लामखडे यांनी लगेच ते दागिने त्यांना दाखवले. बँकेच्या चेअरमन गीतांजली शेळके या शाखेला भेट देण्यासाठी येणार होत्या. त्या आल्यानंतर त्यांच्या हस्ते हे दागिने छाया शेळके यांना देण्यात आले.
चेअरमन गीतांजली शेळके म्हणाल्या की, जी.एस.महानगर बँकेचे सर्वच अधिकारी व कर्मचारी अतिशय परिश्रम घेऊन प्रामाणिकपणे बँकेची सेवा करतात म्हणून बँकेचा नावलौकिक देशभरात झाला आहे. राज्यातील सर्वच शाखांमध्ये ठेवी, कर्जवाटप, वसुली यामध्ये जी एस महानगर बँकेचे नाव सहकार चळवळीत घेतले जाते, कर्मचारी व अधिकारी यांचे योगदान मोठे आहे. शिरुर शाखेचा नावलौकिक पुणे जिल्ह्यात असून शाखाधिकारी बाबाजी लामखडे व राजेंद्र वराळ यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्याने या शाखेचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. वराळ यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे गौरवोद्गार काढले. छायाताई शेळके म्हणाल्या की, कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा आम्हा ग्राहकांना आकर्षित करीत असून जी.एस. महानगर बँकेच्या कोणत्याही शाखेत गेले तरी तेथील सेवा व प्रामाणिकपणा ग्राहकांना आकर्षित करीत असल्याचे सांगत वराळ यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
शाखाधिकारी बाबाजी लामखडे म्हणाले, स्व. शेळके साहेबांचा शिस्त व प्रामाणिकपणा आम्ही सर्वांनी जोपासला आहे. ग्राहक सेवा व बँक हिताचे निर्णय घेऊन बँकेचा नावलौकिक कसा वाढेल, यासाठी आम्ही प्रयत्न केले आहे. वराळ यांचा प्रामाणिकपणा ही समाजातील गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे.










