अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, कारवाई न झाल्यास पोलीस ठाण्यासमोर दशक्रिया विधी
पाथर्डी | नगर सह्याद्री
पाथर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात घडलेल्या विठ्ठल रावसाहेब खर्चन यांच्या मृत्यूप्रकरणी सात दिवसांत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू असलेले ठिय्या आंदोलन बुधवारी मागे घेण्यात आले.
या प्रकरणात पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची तत्काळ बदली करावी, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे, या मागण्यांसाठी सलग तीन दिवस आंदोलन करण्यात आले होते. प्रा.किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ पाथड शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
मृत्यूला पोलिसांचा दबाव व हलगजपणा कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत खर्चन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. बुधवारी सकाळपासून आंदोलकांनी पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत पोलीस निरीक्षक हटवण्याची मागणी केली.या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू व शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी कलबुर्मे यांनी स्वतः चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे व दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलन स्थगित झाल्यानंतर विठ्ठल खर्चन यांच्या पार्थिवावर पाथड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
सात दिवसांत कारवाई न झाल्यास पोलीस ठाण्यासमोरच दशक्रिया विधी करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.दरम्यान, अत्याचार पीडित महिलेच्या तक्रारीसाठी खर्चन हे पोलीस ठाण्यात आले असताना ठाण्याच्या दारातच चक्कर येऊन ते पडले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रा. किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, तालुकाध्यक्ष पप्पू बोर्डे, नगरसेवक अरुण जाधव, प्यारेलाल शेख, विजय गायकवाड, पोपट शेटे, बाळासाहेब गायकवाड, दिलीप माने, अनिल जाधव, दिगंबर गाडे, रोहिणी ठोंबे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
लोकप्रतिनिधींची आंदोलनाकडे पाठ
प्रा. किसन चव्हाण यांनी यावेळी टीका केली. या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकारी जबाबदार असून, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तीन दिवस आंदोलन सुरू असताना देखील लोकप्रतिनिधी व कारखानदार पुढे आले नाहीत, असा आरोप त्यांनी आमदार मोनिकाताई राजळे व प्रताप ढाकणे यांचे नाव न घेता केला.










