शिवसेनेत विलीनकरणाचा मार्ग मोकळा
मुंबई | नगर सह्याद्री
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधील सहा खासदारांची फूट आता उघडपणे दिसू लागली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार अखेर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होणार आहे. सहा खासदारांचा एक स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला होता. दरम्यान, या गटस्थापनेला लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात गटस्थापनेला मंजुरी मिळाली आहे. गट स्थापनेला मंजुरी मिळाल्यानं विलिनीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
ठाकरे सेनेच्या सहा खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे गटाला शिंदे पक्षात विलीनकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर आता शिवसेनेच्या वर्धापनदिनी हे सहा खासदार आपली भूमिका मांडणार आहेत. यात ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे.हे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, त्यांच्या सह्यांचे पत्र गट स्थापननेसाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे देण्यात आले आहे, त्यानंतर आता गट स्थापन करण्यात आला आहे.
एकीकडे उद्धव सेनेच्या सहा खासदारांच्या गटाला मंजूरी दिल्यानंतर, दुसरीकडे खासदार संजय राऊत हे तातडीने लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट घेतली.काल रात्रीपासून ठाकरे गटाचे फुटीर खासदार दिल्लीत दाखल झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. यानंतर ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते.
पक्षप्रवेश १९ तारखेला?
या खासदारांचा अधिकृत पक्षप्रवेश हा आता १९ तारखेला होणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेचा साठावा वर्धापन दिन सोहळा होतोय. नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा सोहळा पार पडणार आहेत. त्याच सोहळ्यामध्ये मोठ्या शक्ती प्रदर्शनासह हा पक्षप्रवेश पार पडणार असल्याची माहिती आहे.
आता राडा होणारच, राज्य गप्प बसणार नाही -संजय राऊतांचा फुटीर खासदारांना इशारा
खासदारांनी आमच्या समोर शपथ घेतल्या, कोणी आई, कोणी मुलीची तर कोणी साईबाबांची शपथ घेतली. पण अर्ध्या रात्री गायब झाले. आता गद्दार खासदारांना सोडणार, राज्य आता गप्प बसणार नाही. आम्ही आता कायदेशीर लढाई सुरू केली आहे, असा गंभीर इशारा खासदार संजय राऊत यांनी फुटीर खासदारांना दिला आहे.
ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर आज संजय राऊत, गटनेते अरविंद सावंत, अनिल देसाई, खासदार राजाभाऊ वाजे यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत संजय राऊत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. जुन्या स्टाईलनं फुटीर नेत्यांना खडेबोल सुनावले. जे खासदार उद्धव ठाकरेंच्या चेहर्यावर आणि मशाल चिन्ह्यावर निवडणून आले त्यांना अशा बेईमानी करण्याचा अधिकार नाही. त्यांना असं सोडून जाणं ते सोपं नाहीये. उद्धव ठकारेंना सोडून जाणार्यांच्या रक्तात बेईनामी असल्याचं राऊत म्हणाले.
एका खासदारान तीन वेळा साईबाबांची शपथ घेतली. एकानं आईची दुसर्यानं मुलीची शपथ घेतली आणि निम्म्या रात्रीच गायब झाले. एका महत्त्वाच्या व्यक्तीनं फोन करून मला महाराष्ट्रातील खासदारांची विक्री होत असल्याचं सांगितलं. प्रत्येकाला ५०-५० कोटी रुपये देण्यात आलेत. त्यातील अॅडव्हन्स म्हणून १५ कोटी रुपये देण्यात आले. त्यानंतर चाटर्ड प्लेन दिल्लीला नेण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.










