स्थानिक नागरिकांमधून संताप
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर ते लोणी रोड रस्त्यावरील आनंद नगर परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला महागड्या आणि ब्रँडेड दारूच्या बाटल्यांचा मोठा खच पडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. एकीकडे हा परिसर सुशिक्षित आणि उच्चभ्रू लोकांची वस्ती म्हणून ओळखला जातो, तर दुसरीकडे याच परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आनंद नगर परिसरातील रस्त्यालगत रात्रीच्या वेळी काही मद्यपी घरातील दारूच्या रिकाम्या बाटल्या सर्रास रस्त्यावर फेकून देत असल्याचे समोर आले आहे. सकाळी फिरायला जाणार्या नागरिकांना आणि महिलांना या रस्त्यावरून जाताना दारूच्या बाटल्यांच्या ढिगार्याचा सामना करावा लागत आहे. पैशांची श्रीमंती असणार्या या वर्गाकडे सामाजिक भान आणि स्वच्छतेच्या मानसिकतेची किती गरिबी आहे, हेच या दृश्यावरून दिसून येते.
हे केवळ दारूच्या बाटल्यांचे ढीग नसून आपल्या ढासळत्या सामाजिक नैतिकतेचे लक्षण आहे. आपण आपल्या घराची स्वच्छता ठेवतो, मग सार्वजनिक रस्ते आणि आपला परिसर स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी नाही का? रस्त्याकडेला पडलेल्या काचेच्या बाटल्यांमुळे निष्पाप पादचारी, लहान मुले आणि मुया जनावरांना गंभीर इजा होऊ शकते. पैशांचे प्रदर्शन करण्यासाठी ब्रँडेड मद्य हवे, पण ते पिऊन कचरा रस्त्यावर फेकणे ही कसली संस्कृती? प्रशासनाने किंवा नगरपंचायतीने कचरा उचलावा, या अपेक्षेने प्रश्न सुटणार नाही. जोपर्यंत नागरिक म्हणून आपण स्वतः शिस्त पाळत नाही, तोपर्यंत आपला परिसर सुंदर होऊ शकत नाही. ‘आनंदनगर’ हे नावाप्रमाणेच आनंदी आणि स्वच्छ ठेवायचे असेल, तर अशा विकृत मानसिकतेला वेळीच चाप लावणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाने या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सार्वजनिक ठिकाणी दारू पिणार्यांवर आणि कचरा करणार्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, हीच गरज आहे.
स्वच्छतादूताकडून बाटल्यांची विल्हेवाट
मी स्वतः या ब्रँडेड दारूच्या बाटल्यांचा खच जमा करून त्या बाटल्यांची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली आहे. असा कचरा करणे सुशिक्षित लोकांना शोभत नाही.
– जयसुर्या नगरे, स्वच्छतादूत










