अहिल्यानगर/ नगर सह्याद्री –
राहुरी बुद्रुक येथील ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थानच्या यात्रा उत्सवानिमित्त होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ५ एप्रिल ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत अहिल्यानगर-शिर्डी मार्गावरील अवजड वाहतूक अन्य मार्गांवर वळविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी निर्गमित केले आहेत.
यात्रेनिमित्त कावड, काठी मिरवणूक, बैलगाडा शर्यती, कुस्ती स्पर्धा आणि छबिना मिरवणूक असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या काळात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रतिबंध घालण्यात आला आहे.
अहिल्यानगरकडून शिर्डी, मनमाड आणि धुळ्याकडे जाणारी वाहने आता विळद सर्कल, शेंडी बायपास, नेवासा फाटा आणि वैजापूर मार्गे जातील. तसेच मनमाडकडून येणारी वाहतूक पुणतांबा, तळेगाव दिघे आणि आळेफाटा मार्गे वळवण्यात आली आहे. संगमनेर आणि नाशिककडे जाणारी अवजड वाहने श्रीरामपूर, नेवासा आणि आळेफाटा मार्गे प्रवास करतील. सिन्नर-लोणी मार्गे येणाऱ्या वाहनांना संगमनेरमार्गे जावे लागेल. हे निर्बंध रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि शासकीय वाहनांना लागू राहणार नाहीत. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.










