भिल्ल समाजाच्या मागणीनंतर ग्रामस्थांची हरकत; अतिक्रमण हटविण्याची मागणी
पाथर्डी| नगर सह्याद्री
तालुक्यातील मिरी येथील शासकीय जागा भिल्ल समाजातील कुटुंबांना घरकुल व शेतीसाठी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी भिल्ल समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबतची माहिती मिळताच मिरी ग्रामस्थांकडून यास विरोध केला जात आहे. त्यामुळे या प्रश्नाला नवे वळण मिळाले आहे.संबंधित कुटुंबांनी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, या प्रकरणात प्रशासनाने वस्तुस्थितीची पडताळणी करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कुटुंबे ही मिरी गावची मूळ रहिवासी नसताना देखील त्यांनी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या शासकीय जागेवर बेकायदेशीरपणे वास्तव्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शासकीय जागेवर कायमस्वरूपी ताबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा
संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर हे अतिक्रमण हटविण्यासाठी मिरी ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीच्या वतीने पाथर्डी पोलीस ठाण्यासह संबंधित प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक सरपंच अनिता गवळी व ग्रामसेवक रमेश त्र्यंबके यांनी दिली.
यापूर्वी केलेले अतिक्रमण प्रशासनाने हटविले
पाच वर्षापूर्वी देखील या कुटुंबांनी मिरी परिसरातील शासकीय जमिनीवर अतिक्रमणे केले होते. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांसोबत संबंधितांनी वाद घालून अरेरावी केली होती. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या मदतीने संबंधित अतिक्रमण काढण्यात आलेले होते. आता पुन्हा तोच प्रकार समोर आल्याने पोलीस प्रशासनाने यात हस्तक्षेप करून अतिक्रमण काढावे.
– जालिंदर गवळी, सामाजिक कार्यकर्ते
प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास
तीव्र आंदोलन करणार ः संतोष शिंदे
प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य कार्यवाही न केल्यास गावातील सर्व गट-तट व राजकीय मतभेद बाजूला ठेवून मिरी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप मंडल अध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे. त्यामुळे आता या संवेदनशील विषयावर महसूल व पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.










