प्रशासन सतर्क, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा नदीला दौंड येथील पुलावरून सोमवारी सायंकाळी 6 वाजता 52 हजार 137 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीपात्रातील आर्वी बेटाकडे जाणारा बंधाऱ्याचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. मंगळवारी सकाळी 1 लाख 60 हजारने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने बेटाचा संपर्क तुटला असून प्रशासनाने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
सुमारे 400 एकर क्षेत्रफळ असलेल्या आर्वी बेटावर 185 नागरिक वास्तव्यास आहेत. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन बेटावरील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने एक रबर बोट उपलब्ध करून दिली असून महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित अधिकारी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. भीमा नदीच्या पाणीपातळीत होत असलेल्या बदलांवर महसूल विभागाकडून नियमितपणे निरीक्षण केले जात असून, आवश्यकतेनुसार तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे.तहसीलदार सचिन डोंगरे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.
सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नदीकाठच्या परिसरात अनावश्यक वावर टाळावा, पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून किंवा नदीपात्रातून जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही तहसीलदार डोंगरे यांनी केले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवली असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.










