समृद्ध पंचायत राज अभियानात कथित गैरव्यवहाराविरोधात नागरिकांचा एल्गार
शेवगाव | नगर सह्याद्री
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 अंतर्गत ग्रामपंचायतींच्या मूल्यांकन प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहार, पक्षपातीपणा आणि पारदर्शकतेच्या अभावाविरोधात सोमवारी सकाळी नांदेड जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले. अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवत आंदोलकांनी जागरण-गोंधळ घालत घोषणाबाजी केली. त्यामुळे पंचायत समिती परिसर आंदोलनाच्या घोषणांनी दणाणून गेला.
या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील मूल्यांकन प्रक्रिया निष्पक्षपणे न झाल्याचा आरोप केला. योग्य काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना डावलून अन्यायकारक पद्धतीने गुणांकन करण्यात आल्याचा दावा करत संपूर्ण प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
ग्रामस्थांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामविकासाच्या नावाखाली प्रामाणिक ग्रामपंचायतींवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
दरम्यान, यापूवही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ शेवगाव तालुक्यातील वाघोली ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी थेट शेवगावमध्ये येऊन जागरण-गोंधळ आंदोलन केल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे दिसून येत आहे.
आंदोलनादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली, अन्यथा यापुढे राज्यस्तरावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. या आंदोलनामुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील मूल्यांकन प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, शासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करणार का, याकडे ग्रामस्थांसह राज्याचे लक्ष लागले आहे.










