नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात मुर्शिदाबाद जिल्ह्यात दोन गट आपापसात भिडले असल्याची घटना समोर आली आहे. मतदान सुरू असतानाच तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि हुमायून कबीर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. या संघर्षामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या भागीरथपूर परिसरात दोन्ही गट आमने-सामने आले. वाद वाढत जाऊन परिस्थिती हाताबाहेर गेली आणि दगडफेक सुरू झाली. हुमायून कबीर यांच्या ताफ्यावरही दगडफेक करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या वाहनांच्या काचा फुटल्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.
या गोंधळात सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्कीचा सामना करावा लागला. दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत वातावरण आणखी तापवले. हुमायून कबीर यांच्या पक्षाने टीएमसी समर्थकांवर हल्ल्याचा आरोप केला आहे, तर टीएमसीकडूनही यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काल रात्री नाओदा परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तणावाची ठिणगी पडली होती. आज सकाळी हुमायून कबीर घटनास्थळी पोहोचल्यानंतर पुन्हा संघर्ष उफाळून आल्याचे सांगितले जात आहे. कबीर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोप केला की, टीएमसी समर्थकांनी मतदान प्रक्रियेत अडथळे निर्माण केले.
याचबरोबर, मुर्शिदाबादव्यतिरिक्त सिलीगुडी आणि आसनसोलमध्येही तणावाच्या घटना घडल्या. सिलीगुडीतील एका मतदान केंद्रावर भाजप उमेदवार शंकर घोष आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला, तर आसनसोलमध्ये पोलिसांनी भाजप उमेदवार अग्निमित्रा पॉल यांना अडवल्याने वाद निर्माण झाला.
आज राज्यातील १६ जिल्ह्यांमधील १५२ जागांसाठी मतदान होत असून, कडक सुरक्षा व्यवस्था असूनही अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या पोलिस आणि सुरक्षा दल परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असून, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










