थकीत मालमत्ता करावरील शास्तीमाफी योजनेला नागरिकांचा प्रतिसाद / थकबाकीदार मालमत्ताधारक नागरिकांनी योजनेला लाभ घेऊन तात्काळ थकीत कर भरावा : आयुक्त यशवंत डांगे
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
महापालिकेने थकीत मालमत्ता कराच्या वसुलीला गती देण्यासाठी थकीत रकमेवरील शास्तीत (दंड) १०० टक्के सूट देण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत दिली होती. या कालावधीत थकबाकीदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, अद्यापही मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यामुळे शास्तीमाफीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देऊन थकबाकी भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी १०० टक्के शास्ती माफीची घोषणा करण्यात आली होती. १५ मार्चपर्यंत थकीत करावरील दंडाची रक्कम पूर्णपणे माफ करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद मिळत असल्याने ही मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात येत आहे. थकबाकीदार मालमत्ताधारक नागरिकांनी या सवलतीचा लाभ घेऊन थकीत कराचा भरणा करावा. मुदत संपल्यानंतर महानगरपालिकेकडून वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. त्यामुळे थकीत कराचा संपूर्ण भरणा करून शास्तीमाफीचा लाभ घ्यावा व कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.
दरम्यान, कर भरण्यासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पेमेंट सुविधाही उपलब्ध आहे. शहराबाहेर असलेल्या किंवा कर भरण्यासाठी महानगरपालिकेच्या कार्यालयात येऊ न शकणाऱ्या नागरिकांनी देखील शास्तीमाफी योजनाचा फायदा घेण्यासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जावून कराचा भरणा करावा, असेही आयुक्त यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.










