वृद्धेश्वर कारखान्यानजीक घटना; स्थानिक नागरिकांचे तत्पर बचावकार्य
पाथर्डी / नगर सह्याद्री –
पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर साखर कारखान्यानजीक मंगळवारी (दि. २) दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास शेवगाव आगाराच्या एसटी बसचा भीषण अपघात होऊन १५ प्रवासी जखमी झाले. यामध्ये दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असून इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शेवगाव आगाराची एसटी बस (क्र. एमएच १४ बीटी ४१२६) ही ५२ प्रवाशांना घेऊन शेवगावहून अहिल्यानगरकडे निघाली होती. शेवगाव–तिसगाव मार्गावरील वृद्धेश्वर कारखान्यानजीक आल्यानंतर अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटली. अपघात इतका अचानक झाला की बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक प्रवासी जागेवरून फेकले गेले, तर काहीजण बसमध्ये अडकून पडले.
अपघातानंतर बसमधून डिझेल गळती सुरू झाल्याने आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बसच्या खिडक्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तर अडकलेल्या महिला, वृद्ध आणि लहान मुलांना नागरिकांनी सुरक्षित बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मदतीसाठी धावून आले. रंगनाथ चितळे, राजेंद्र तुपे, गणेश काकडे, अनिल राजळे, वृषिकेश शिरसाठ, नवनाथ तिजोरे, संतोष वाघमारे, अक्षय फुलारी, अक्षय पवार, सिमोन तिजोरी, स्वप्निल चितळे, अभिजीत शेळके, मच्छिंद्र म्हसके, पप्पू बनकर, संतोष शेळके, गणेश वेताळ, पप्पू लेंडगुळे, पवार सर, गणेश पवळे, नवनाथ पवार व संदीप काकडे यांनी बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
नागरिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकांद्वारे तिसगाव, पाथर्डी आणि शेवगाव येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या दोन प्रवाशांवर उपचार सुरू असून इतरांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. दरम्यान, चालकाचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नागरिकांच्या तत्परतेने टळली मोठी जीवितहानी
अपघातानंतर बसमधून डिझेल गळती सुरू झाल्याने आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेत धाडसी बचावकार्य केल्याने मोठी जीवितहानी टळली. त्यांच्या या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.










