अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील दरेवाडी परिसरातील जमीन विक्रीच्या व्यवहारात १८ जणांनी संगनमत करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फिर्यादी सुशील श्रीकांत रानमळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दरेवाडी येथील गट क्रमांक १६८/२ अ ही जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या जुन्या न्यायालयीन वादाचा गैरफायदा घेत आरोपी दत्तू बबन राहिंज, पांडुरंग बबन राहिंज, सुग्रीव विष्णू राहिंज, दुर्वास विष्णू राहिंज, सुनिता कैलास शिंदे, मनिषा गौतम राहिंज, दिव्या गौतम राहिंज, भारती गौतम राहिंज, ओम गौतम राहिंज, आकाश पांडुरंग राहिंज, पवन पांडुरंग राहिंज, राहुल पांडुरंग राहिंज, सचिन दत्तात्रय राहिंज, अजय सुरेश ओसरकर, विजय दत्तात्रय करांडे, अमोल कांतीलाल मुथा, आणि गणेश रोहिदास शेलार यांनी कट रचला.
या आरोपींनी फिर्यादीची दिशाभूल करत सदर जमीन परस्पर १ कोटी ३ लाख रुपयांना बेकायदेशीरपणे विक्री केली. या व्यवहारात आरोपींनी संगनमत करून फसवणूक केली आहे. जेव्हा फिर्यादीने या फसवणुकीबाबत आरोपींकडे विचारणा केली, तेव्हा त्यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देऊन हुसकावून लावले.
न्यायालयाच्या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी १८ आरोपींविरुद्ध फसवणूक, बनावटगिरी, धमकी देणे आणि संगनमत करणे यासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत. शहरात जमिनीच्या व्यवहारातील फसवणुकीची ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.










