श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुयातील कलिंगड व कांदा उत्पादक शेतकरी सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटाला सामोरे जात असून अक्षरशः हवालदिल झाले आहेत. उन्हाळा म्हणजे कलिंगडाचा हंगाम.या काळात चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. मात्र यंदा बाजारपेठेतील घसरलेल्या दरांनी शेतकर्यांच्या आशा पूर्णपणे मातीमोल केल्या आहेत.
महिनाभरापूर्वी २२ ते २५ रुपये प्रति किलो दराने विकले जाणारे कलिंगड आज केवळ ५ ते १० रुपये प्रति किलो या अत्यल्प दरात विकले जात आहे. काही ठिकाणी तर याहूनही कमी दराने विक्री होत असल्याचे चित्र आहे. उत्पादन खर्चाचा विचार केला तर बियाणे, खत, औषधे, मजुरी, पाणी व्यवस्थापन आणि वाहतूक यासाठी मोठा खर्च येतो. परंतु सध्याच्या बाजारभावामुळे हा खर्चही निघणे कठीण झाले असून शेतकर्यांना तोट्यात माल विकण्याची वेळ आली आहे.कलिंगड हे लवकर खराब होणारे पीक असल्याने ते साठवून ठेवण्याचा पर्यायही शेतकर्यांकडे नाही. परिणामी, मिळेल त्या दरात माल विकण्याशिवाय पर्याय उरत नाही. अनेक शेतकर्यांना विक्री न झालेला माल शेतातच टाकून द्यावा लागत आहे, ज्यामुळे त्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे.

मेहनतीने पिकवलेले पीक अशा प्रकारे वाया जाताना पाहणे, ही शेतकर्यांसाठी अत्यंत वेदनादायक बाब आहे.यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असले तरी बाजारपेठेत मागणी तुलनेने कमी असल्याचे दिसून येते. तसेच व्यापार्यांकडून होणारा दरकपातही शेतकर्यांच्या अडचणी वाढवणारा ठरत आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कलिंगडाला हमीभाव जाहीर करावा, शेतमाल खरेदीसाठी शासकीय यंत्रणा सक्रिय करावी, तसेच थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा शेतकर्यांचे हे नुकसान अधिकच वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
शेतकरी आर्थिक संकटात
श्रीगोंदा तालुक्यातील कलिंगड उत्पादक शेतकरी व कांदा उत्पादक शेतकरी अवकाळी पावसामुळे सध्या कठीण परिस्थितीतून जात असून त्यांच्या या समस्येकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास शेतकर्यांना दिलासा मिळू शकतो, असे मत आठवले आरपीआय श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी व्यक्त केले.










