पारनेर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र पिंपळनेर येथून सद्गुरुनिष्ठ निळोबाराय महाराज यांच्या मानाच्या नवव्या क्रमांकाच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवार, दि. 10 जुलै रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात होणार आहे.
सकाळी साडेदहा वाजता निळोबाराय महाराजांच्या राहत्या वाड्यातून पालखीचे प्रस्थान होईल. त्यानंतर पालखी संजीवनी समाधी मंदिरात दाखल झाल्यानंतर दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्याहस्ते संजीवनी समाधीचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे, कृषिमंत्री दत्ता भरणे, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीचा पंढरपूरकडे प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. यावेळी निळोबाराय गाथा प्रकाशन होणार आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात तब्बल 68 दिंड्या सहभागी होत असून पिंपळनेर ते पंढरपूर या संपूर्ण वारीदरम्यान दीड लाखांहून अधिक वारकरी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
पिंपळनेर ते पंढरपूर हा सुमारे 250 किलोमीटरचा प्रवास 13 मुक्कामांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. वारीतील अत्यंत महत्त्वाचा गुरु-शिष्य भेट सोहळा शनिवार, दि. 18 जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे दुपारी 2.30 वाजता पार पडणार आहे.जगद्गुरू तुकाराम महाराज व सद्गुरुनिष्ठ निळोबाराय महाराज यांच्या पालख्यांचा पारंपरिक भेट सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.त्यानंतर दि. 23 जुलै रोजी पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत निळोबाराय महाराजांच्या पादुकांचे पवित्र स्नान होणार असून, आषाढी वारीच्या धार्मिक परंपरेतील हा महत्त्वाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होईल. वारकऱ्यांना पालखी सोहळ्यात शासनाच्यावतीने आरोग्यसेवा व इतरही सेवा पुरवण्यात आले आहे. या पालखी सोहळ्याच्या सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव सावंत, पालखी सोहळ्याचे प्रमुख हभप गोपाळ बुवा मकाशीर यांनी दिली.










