प्रलंबित वीज प्रश्नावर टाकळी ढोकेश्वरमध्ये आंदोलन
पारनेर / नगर सह्याद्री –
पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज प्रश्नावरून गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या असंतोषाचा आज अखेर उद्रेक झाला. गेल्या तीन वर्षांपासून मंजूर असूनही ‘आरडीएसएस’ (RDSS) योजनेतील सिंगल फेज वीज कनेक्शन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरण प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आज टाकळी ढोकेश्वर येथील उपअभियंता कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांना ‘बांगड्यांचा आहेर’ देऊन कार्यालयाला कुलूप ठोकले. या ‘टाळेबंद’ आंदोलनामुळे महावितरण प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
लोकनेते खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यासाठी आरडीएसएस योजनेतंर्गत महत्त्वाची वीज कामे मंजूर करण्यात आली होती. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांची उदासीनता आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांना अद्यापही अधिकृत वीज कनेक्शन मिळालेले नाही. हक्काच्या विजेसाठी शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही केवळ पोकळ आश्वासने मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आज तुटला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले होते. म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल उगले यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १०:३० वाजल्यापासून शेकडो शेतकरी कार्यालयाबाहेर जमले होते. रणरणत्या उन्हात सलग साडेतीन तास आंदोलकांनी ठिय्या मांडला. प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोबत आणलेल्या बांगड्यांचा आहेर अधिकाऱ्यांना सुपुर्द केला, ज्यामुळे वातावरण अधिकच तापले होते. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, तात्काळ काम सुरू करा अन्यथा कार्यालय उघडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा सरपंच प्रकाश गाजरे यांनी घेतला.

brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 46;
या आंदोलनात तालुक्याचे लक्ष वेधून घेणारी आंदोलकांची गर्दी जमली होती. यामध्ये सरपंच प्रकाश गाजरे, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र राजदेव, राष्ट्रवादीचे नेते अमोल उगले यांच्यासह सरपंच अभिजीत झावरे, पांडुरंग आहेर, खंडू भाईक, कैलास सैद, प्रवीण सैद, अनिल आहेर, झांबर दरेकर, बाळासाहेब आहेर, संपत वाळुंज, विठ्ठल रोहकले, अशोक वाळुंज, शुभम काळे, दात्तराय वाळुंज, राजेंद्र दुधवडे, साहेबराव दुधवडे, संदीप गुंजाळ, काळूराम दुधवडे, लक्ष्मण कारंडे, गिरजु सूळ, लहू वाळुंज, ऋषिकेश वाळुंज, संजय पारधी, लहू भुतांबरे, विष्णू वाळुंज, बाबासाहेब वाळुंज, साहिल वाळुंज, भागचंद वाळुंज यांसह म्हसोबा झाप, वारणवाडी, कामटवाडी, वासुंदे, नांदूर पठार, सावरगाव, पळसपुर, काटाळवेढा, काकणेवाडी, खडकवाडी, पळशी या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
तोडगा निघेपर्यंत टाळे कायम; आंदोलकांची भूमिका
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. जोपर्यंत नवीन वीज कनेक्शनच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही आणि लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कार्यालयाचे टाळे उघडले जाणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. या आंदोलनामुळे टाकळी ढोकेश्वर परिसरातील महावितरणचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. प्रशासकीय दिरंगाईचा निषेध करणारा हा ‘बांगड्यांचा आहेर’ सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
अरेरावीची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा; आंदोलनकर्त्यांची वरिष्ठांकडे मागणी
टाकळी ढोकेश्वर येथील महावितरणचे अधिकारी देशमुख यांना निलंबित करण्यात यावे ते शेतकरी वर्गाशी अरेरावीची भाषा करत आहेत अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली देशमुख यांना निलंबित करण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. संबंधित टाकळी ढोकेश्वर येथील अधिकाऱ्याविषयी आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती व त्यांची असलेली नाराजी आंदोलनातून दिसून आली.










