मुंबई / नगर सह्याद्री –
भारतीय हवामान खात्याने नैऋत्य मान्सून आगमनचा अंदाज वर्तवला आहे. अंदमानचा समुद्र आणि अंदमान निकोबार बेटांच्या काही भागात आठवड्याच्या शेवटापर्यंत मान्सून दाखल होण्यास अनुकूल वातावरण झाले असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रात १५ मे पर्यंत ठिक ठिकाणी २-३ अंश सेल्सिअस तापमानात वाढ होणार आहे. दरम्यान, राज्यातील तापमान १८ मे पर्यंत चढेच राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे.
भारतीय हवामान खात्याने नैऋत्य मान्सून आगमनचा अंदाज वर्तवला आहे. अनुकूल हवामान परिस्थिती असल्याने 6 जून रोजी कोकणात मान्सूनचे आगमन होणार असून, त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, बंगालचा उपसागरातील काही भाग आणि निकोबारांच्या बेटांवर पुढील 48 तासात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे केरळ आणि राज्यात देखील मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.
IMD ने यापूर्वी 19 मे पर्यंत मान्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. यानंतर 31 मे पर्यंत मान्सून देशाचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये पोहोचेल, अशी माहिती दिली आहे. यामुळे राज्याच्या इतर भागात मान्सूनच्या आगमनाबाबत उत्सुकता असल्याचे आयएमडी अधिकाऱ्यांनी सांगितले.
IMD अंदमान आणि केरळ प्रदेशात मान्सूनच्या आगमनाचा अंदाज देत असताना, इतर राज्यांसाठी तारखांचा अंदाज देत नाही. डेटाच्या आधारे, मान्सूनच्या उत्तरेकडील प्रगतीचे मॅप केले जाते. त्यानुसार मान्सून 5 जून रोजी गोव्यात दाखल होऊन 6 जूनपर्यंत कोकणात पोहोचण्याची शक्यता आहे. 7 जूनपर्यंत पुण्यात येण्याचा अंदाज आहे. उल्लेखनीय म्हणजे, या वर्षीच्या मान्सूनच्या प्रारंभादरम्यान बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ तयार झाले नाही. ज्यामुळे मान्सून कोणत्याही व्यत्ययाविना प्रवाश करु शकतो. 2005 पासून, IMD सांख्यिकीय पद्धती वापरून केरळमध्ये मान्सूनच्या आगमन तारखेचा अंदाज वर्तवत आहे.










