मुंबई / नगर सह्याद्री –
मे महिना संपायला काही दिवस शिल्लक असले तरी राज्यातील उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तापमानात मोठी वाढ झाली असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने अशरक्ष: झोडपले आहे. आता काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे.
तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी उष्णतेचा तसेच पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात उष्णतेची तीव्रता सर्वाधिक असून अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर आणि अकोला जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट कायम आहे. तसेच पुढील काही दिवस विदर्भातील वातावरण उष्ण आणि कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर या कोकणातील जिल्ह्यांमध्येही उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तापमान वाढल्याने उकाडा अधिक जाणवणार आहे. मात्र रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
मराठवाड्यातील बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड येथे हलक्या स्वरूपाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
१२ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
पश्चिम महाराष्ट्रातही हवामान बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. थोडक्यात पावसाचा इशारा १२ जिल्ह्यांना देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यातील हवामान अस्थिर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत उष्णतेची लाट कायम राहणार तर काही भागांत वादळी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषतः शेती, वाहतूक आणि जनजीवनावर त्याचा परिणाम झाला आहे.










