पश्चिम बंगाल / वृत्तसंस्था –
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान आज छपरा, शांतीपूर आणि भांगरसह अनेक ठिकाणी हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना घडल्या.
पीटीआयच्या वृत्तानुसार, एंटाली मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रियाना तिब्रेवाल यांचा मतदान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद झाला, कारण त्यांच्या प्रतिनिधीला मतदान केंद्रातून बाहेर काढण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मतदान केंद्र लहान असल्यामुळे एजंटला तेथून निघून जाण्याचा आदेश देण्यात आला. या वादात टीएमसी उमेदवाराचा प्रतिनिधीही सामील झाला, त्यानंतर दोघांनाही तेथून निघून जाण्यास सांगण्यात आले. भाजप नेत्याने खंत व्यक्त केली की, हे लोक किती त्रासदायक आहेत. एक बटण दाबण्यासाठी त्यांना आत १० लोकांना उभे करावे लागते.
नादिया जिल्ह्यातील छपरा येथे एका भाजप कार्यकर्त्यावर टीएमसी सदस्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मोशरीफ मीर या कार्यकर्त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मीर यांनी दावा केला की, डझनहून अधिक तृणमूल कार्यकर्त्यांनी, ज्यापैकी एकाकडे बंदूक होती, त्यांच्यावर हल्ला करून त्यांना सळ्यांनी मारहाण केली. छपरा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले भाजपचे उमेदवार सैकत सरकार यांनी या हल्ल्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरले. त्यांच्या डोक्यावर प्रहार झाल्याने त्यांना दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले.
पीटीआयने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, निमलष्करी जवान आणि एक पोलीस एका व्यक्तीचे हात किंवा पाय पकडून त्याला फरफटत नेत असल्याचे दिसत आहे. दोन सशस्त्र सुरक्षा कर्मचारी एका व्यक्तीला काठ्यांनी मारहाण करतानाही दिसत आहेत.
भाजप कार्यालयाची तोडफोड
दरम्यान, शांतीपूरमधून मालमत्तेच्या नुकसानीचे वृत्त आले आहे. पोलिसांनी सांगितले की, स्थानिक भाजप कार्यालयातील फर्निचरची तोडफोड करण्यात आली, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगर येथे, डाव्या आघाडीशी संलग्न असलेल्या इंडियन सेक्युलर फ्रंट या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेच्या एका पोलिंग एजंटला मतदान केंद्रात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप आहे.
भाजप उमेदवाराच्या गाडीची तोडफोड
दक्षिण २४ परगणा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विकास सरदार यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. त्यांच्या केशरी रंगाच्या मारुती बलेनोची मागची काच फुटली होती. पक्षाने यासाठी तृणमूल कार्यकर्त्यांना जबाबदार धरले आहे.










