राहुरी | नगर सह्याद्री
जैवविविधता जपण्यासाठी वृक्ष लागवड गरजेचे आहे. प्रत्येक विदयार्थी व कर्मचाऱ्याने एक वृक्ष लावून त्याचे जतन करावे. वृक्षांमुळे जैवविविधता वाढते, मातीची धूप थांबून पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. याववर्षीपासून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात जास्तीत-जास्त वृक्ष लागवड होण्यासाठी फुले हरित अभियानाची सुरुवात करत आहोत, अशी माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी दिली.
महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागांतर्गत पाणलोट क्षेत्र व प्रशिक्षण केंद्रामार्फत पाणलोट क्षेत्र परिसरात फुले हरित अभियानांतर्गत तसेच उद्यानविद्या प्रक्षेत्रावर वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी वृक्षरोपण करताना डॉ. विलास खर्चे बोलत होते.
यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कृषि तंत्र शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलिक, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, काष्टी मालेगाव छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. भरत पाटील, मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सचिन नांदगुडे, डॉ. विजयकुमार पाटील, सहायक कुलसचिव वैभव बारटक्के आदी उपस्थित होते.










