मुंबई / नगर सह्याद्री –
मोदी सरकार आणू पाहत असलेले महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाले. या विधेयकावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ‘महिला आरक्षण विधेयकाआडून देश तोडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव होता आणि तो विरोधी पक्षांनी उधळवून लावला.’, असा टोला उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. तसंच त्यांनी सर्व मलाच पाहिजे या हव्यासाची वखवख सुटल्याचा टोला पक्ष सोडून गेलेल्यांना लगावला. भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमात सर्वांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी सत्ताधारी विरोधकांच्या मागे ईडी-सीबीआय लावत असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘सगळं बळकवायचे काम यांच्याकडून सुरू आहे. तुमच्यात जिंकण्याची हिंमत नाही त्यामुळे तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी ईडी, सीबीआयच्या फौजा घुसवत आहेत. तुमचे कतृत्व कमी पडत आहे, तुम्ही केलेले काम कमी पडत आहे. तिकडे नाक्या नाक्यावर फौजा उतरवल्यानंतर कसलं महिला आरक्षण, महिला कशा बाहेर पडतील. कशा निवडणूका होणार. या देशात लोकशाही जिवंत राहिली की नाही हा विचार करावा लागतोय.’
तसंच, ‘ईडी, सीबीाय, इनकम टॅक्स, पोलिस सर्वांना बाजूला ठेवा आणि शिवसेनेशी सामना करायला या. जरा काही झालं तर पकडायचं, केसेस टाकायच्या. जुन्या केसेस काढायच्या आणि छळायचं. मागे सगळं लावायचं आणि म्हणायचं आम्ही जिंकलो. पण हे पुचाटांचा कारभार आहे. महाराष्ट्राने तर हे सहन करता कामा नये. या महाराष्ट्राने प्रत्येक वेळेला देशाला दिशा दाखवली आहे. प्रत्येक वेळा देश संकटात असताना महाराष्ट्र धावून गेला आहे हा इतिहास आहे. जर महाराष्ट्रावर अन्याय होत असेल जसा बंगालमध्ये बंगाली उभा राहिला आहे, तामिळनाडूमध्ये तमिळी उभा राहिला आहे तसं महाराष्ट्रात तुम्हाला महाराष्ट्रीय म्हणून उभं राहिले पाहिजे.’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.










