पारनेर | नगर सह्याद्री
टाकळी ढोकेश्वर परिसरात अजून समाधानकारक पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडल्याने नागरिकांसह जनावरांनाही पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि तहसील प्रशासनाकडे वाढीव पाणीटँकर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
टाकळी ढोकेश्वर येथील निवडुंगेवाडीसाठी सध्या केवळ एकच पाणीटँकर सुरू असून तो अपुरा पडत आहे. परिसरातील पाणीसाठे संपुष्टात आल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे किमान आणखी पाच पाणीटँकर तातडीने मंजूर करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि तहसीलदार पारनेर यांना देण्यात आले. प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित वाढीव पाणीटँकर मंजूर करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.या निवेदनावर युवा नेते विक्रम झावरे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश पायमोडे, मळीभाऊ रांधवण, ओमकार उर्फ बबलू झावरे दत्तात्रय निवडुंगे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पाणीटंचाईमुळे भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष
टाकळी ढोकेश्वर परिसरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नागरिकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. आम्ही स्वतः पुढाकार घेऊन मोफत टँकर सुद्धा ग्रामस्थांना देत आहोत. पाणीटंचाईची परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वाढीव पाणीटँकर मंजूर करावेत, हीच आमची मागणी आहे.
– विक्रम झावरे,टाकळी ढोकेश्वर










