पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी
निघोज | नगर सह्याद्री
निघोज पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या रसाळवाडी मोरवाडी परिसरातील रामवाडी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला. गुरुवार दि.9 रोजी पहाटे चारच्या दरम्यान सत्यवान विष्णू वाव्हळ यांच्या शेळीचा फडशा पाडीत बिबट्याने दहशत निर्माण केली असून याचा बंदोबस्त करण्यासाठी लवकरात लवकर रामवाडी परिसरात वनविभागाने पिंजरा लावून सहकार्य करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वनविभागाच्या अधिकारी रेष्मा पाठक यांनी तातडीने रामवाडी येथे वाव्हळ यांच्याकडे डॉक्टर व कर्मचारी पाठवून संबंधित जागेची पाहणी केली. बिबट्यानेच शेळीचा फडशा पाडला असल्याचे बिबट्याचा ठशावरुन सिद्ध झाले आहे. या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याने या ठिकाणी वास्तव्य केले आहे. आठ दिवसांपूव लंके वस्ती, गाडीलगाव, बोदगेवाडी या परिसरात बिबट्या आला असल्याची माहिती प्रगतीशील शेतकरी दत्तात्रय रामभाऊ लंके यांनी दिली आहे.
शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत. शेतकरी रानात जाण्यास घाबरत आहे. यासाठी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. रामवाडी येथील सत्यवान विष्णू वाव्हळ हे गरीब कुटुंब आहे. शेतीला जोडव्यवसाय म्हणून ते दूध व्यवसाय करतात. तसेच शेळीपालन करतात. बिबट्याने शेळीचा फडशा पाडल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. वनविभागाने पंचनामा केला असून सरकारने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.










