अंगणवाडीच्या मूळ कामावर परिणाम होत असल्याचा दावा;
अतिरिक्त कामासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी
पारनेर | नगर सह्याद्री
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीने राज्यातील तहसीलदारांना निवेदन देऊन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर सोपविण्यात आलेली बीएलओ व बीएलओ सहाय्यक पदाची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांकडे आधीच अनेक जबाबदाऱ्या आहेत. अंगणवाडीतील बालकांची देखभाल, पोषण आहार, गर्भवती व स्तनदा मातांची नोंद, विविध सर्वेक्षणे, ऑनलाइन माहिती भरणे तसेच शासनाच्या इतर योजनांची अंमलबजावणी यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर मोठा कामाचा ताण आहे. अशा परिस्थितीत बीएलओ व बीएलओ सहाय्यक म्हणून अतिरिक्त जबाबदारी दिल्यास अंगणवाडीच्या मूळ कामावर परिणाम होऊन बालकांच्या संगोपन व पोषण सेवांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वी शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मूळ कामाव्यतिरिक्त अतिरिक्त कामे देऊ नयेत, असे निर्देश दिल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे बीएलओ व बीएलओ सहाय्यक पदासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी किंवा आवश्यक असल्यास त्या कामासाठी स्वतंत्र मानधनावर कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी समन्वय समितीने केली आहे. अहिल्यानगर येथे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी मंगल शिंदे, आशा मगर, लीला गाडे, संगीता उंडे, अलका शिंदे, शांता बत्तीसे, मंदा साळुंके, अलका साळवे, सविता काशिद, नंदा मोरे आदी उपस्थित होते.
आधीच विविध शासकीय योजनांची मोठी जबाबदारी
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर आधीच बालकांचे पोषण, शिक्षण, आरोग्य आणि विविध शासकीय योजनांची मोठी जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत बीएलओ व बीएलओ सहाय्यक पदाचे अतिरिक्त काम देणे अन्यायकारक आहे. शासनाने ही नियुक्ती तातडीने रद्द करून स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करावेत, जेणेकरून अंगणवाडीतील बालकांच्या सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही.
– जयश्री वाबळे-झावरे, खडकवाडी, पारनेर










