बळीराजाला जोरदार पावसाची प्रतीक्षा
रमेश चौधरी | नगर सह्याद्री
पुरेशा पावसाअभावी शेवगाव तालुक्यातील 35 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. हवामान खात्याचे अंदाज फोल ठरत आहे. यापुढे होणाऱ्या पेरण्याने उत्पन्नात घट होण्याचा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे.
यंदा जून महिना खरीप पेरणीला बाधक ठरला गेला. मृग नक्षत्र कोरडेच गेल्यासारखे झाले. अदलून बदलून येणारे वेगवेगळे हवामान अंदाज शेतकऱ्यांत निराशा करणारे होते. जूनच्या अखेरीस भाग बदलत झालेल्या पावसावर नाईलाजास्तव उशीरा पेरणीला सुरवात झाली तर काही भागात अद्याप जेमतेम पाऊस असल्याने शेतीच्या मेहनतीच झाल्या नाही. त्यामुळे पेरणी कशी होणार, या विचाराने शेतकरी चिंतीत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बागायत क्षेत्रातील पडलेले कोरडेठाक विहीर, बोअर चिंतेत भर टाकणारे झाले आहेत.
गतवष मे महिन्यातच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता.त्यातच मान्सून वेळेवर दाखल झाला. परिणामी वेळेवर पेरण्या झाल्या होत्या. याहीवषच अशीच अपेक्षा असताना निसर्गाने हे चित्र बदलून टाकले आणि उष्णतेचे शेतकऱ्यांना चटके दिले. जून संपला, जुलै सुरू झाला. नक्षत्र सरले मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम राहिली आहे. आज, उद्या करता करता येणारा प्रत्येक दिवस ढगाळ वातावरण अथवा रिमझिम पावसावर ढकलत आहे.
शेवगाव तालुक्यात जवळपास 65 हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले असताना आजतागायत फक्त 30 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्याचा अंदाज देण्यात आहे. 35 हजार हेक्टर क्षेत्र तहानलेले असल्याने त्यावरील पेरण्या खोळबंल्या आहेत. शेवगाव तालुक्यात कपाशी पिकाचे क्षेत्र मोठ्या संख्येवर आहे, परंतु पावसाने खोडा घातल्यामुळे काय होईल, अशी भिती निर्माण झाली आहे. या खरीप हंगामात बाजरी 1600, कापूस 38500, तूर 14500, सोयाबीन 3800, उडीद 3450, मुग 1950, मका 210, कांदा 200 असे उद्दिष्ट्य आहे.
कपाशी लागवड बंद
काही शेतकऱ्यांनी पाऊस होईल, या अपेक्षेवर कपाशी लागवड सुरू केली असताना विसगंत व कमी पाऊस, जाणवणारी उष्णता, जमिनीतील ओल याचा विचार करून आता दमदार पाऊस होईपर्यंत कपाशी लागवड बंद केली आहे.










