दोन्ही बाजूंचे कठडे गायब, शेकडो विद्यार्थ्यांचा प्रवास धोक्यात
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्याच्या उत्तर भागातील देसवडे येथील टेकडवाडी व जांबुत-साकुर रस्त्यावरील मुळा नदीवर असलेला पूल सध्या धोकादायक अवस्थेत आहे. या पुलाला दोन्ही बाजूंनी सुरक्षा कठडे (रेलिंग) नसल्यामुळे येथून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असून, प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
टेकडवाडी परिसरात जवळपास 700 ते 800 लोकसंख्या आहे. देसवडे येथील टेकडवाडी, जावळदरा, पोखरी, जांबुत बुद्रुक, ठाकरवाडी आणि भिल्ल वस्ती या भागातील शेकडो विद्याथ शिक्षणासाठी साकुरसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या गावी जातात. या सर्वांना दररोज याच पुलावरून ये-जा करावी लागते. पुलाला कठडेच नसल्याने सायकल किंवा दुचाकीवरून जाताना लहानसा थरकापही मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो.
मुळा नदी ही पावसाळ्यात नेहमीच दुधडी भरून वाहते. अनेकदा पूर आल्यावर पाण्याचा प्रवाह पुलाच्या अगदी जवळून किंवा पुलावरून जातो. अशा वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने आणि बाजूला कोणतेही संरक्षक कठडे नसल्याने एखादे वाहन किंवा पादचारी थेट नदी पात्रात वाहून जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. येथे मोठा अपघात घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन पावसाळा सुरू होण्यापूव या पुलाला चांगल्या दर्जाचे संरक्षक कठडे बसवावेत, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. अन्यथा, आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
काम सुरू न केल्यास रस्त्यावर उतरणार
अनेक दिवसांपासून आम्ही प्रशासनाकडे पुलाला कठडे बसवण्याची मागणी करत आहोत, पण अधिकारी ढिम्म आहेत. पावसाळ्यात मुळा नदीला पूर आल्यावर जीव मुठीत धरून मुलांची वाट पाहावी लागते. शाळकरी मुले आणि ग्रामस्थांचा जीव धोक्यात आहे. प्रशासनाने तत्काळ काम सुरू न केल्यास रस्त्यावर उतरावे लागेल.
– दत्ता टेकुडे, ग्रामस्थ










