मुंबई / नगर सह्याद्री –
‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. संचिता उगलेने अचानक आयुष्य संपवल्यामुळे तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशात संचिताचा भाऊ आकाश सतीश उगले यांनी आपल्या बहिणीची आत्महत्या आणि २०२० मध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचे अकाली निधन यांच्यात संबंध असल्याचा आरोप केला आहे.
संचिताता भाऊ म्हणाला की, “त्याने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली, का? कारण बॉलिवूड या चित्रपटसृष्टीने त्याच्यावर खूप दबाव टाकला होता आणि त्या दबावामुळेच त्याने आत्महत्या केली. त्याचप्रमाणे, काल माझ्या बहिणीनेही त्याच कारणास्तव आत्महत्या केली…केवळ एक दिवस आधी, म्हणजेच कालच, तिने एक इन्स्टाग्राम रील पोस्ट केली होती ज्यावर लिहिले होते, “इट्स अगेन १४ जून…” याचा अर्थ असा की १४ जून पुन्हा आला आहे आणि कालच तिनेही आत्महत्या केली…त्यामुळे मी माझ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांना विनंती करतो की, कृपया या घटनेची दखल घ्यावी…”

संचिताच्या भावाने असा दावा केली की, त्यांची बहीण आणि सुशांत या दोघांवरही चित्रपटसृष्टीचा प्रचंड दबाव होता. तसेच, सहा वर्षांच्या अंतराने एकाच तारखेला तिने आत्महत्या केली, या योगायोगाकडेही त्यांनी लक्ष वेधले. संचिताच्या भावाने पुढे सांगितल्याप्रमाणे, संचिता उगलेचे दुसरे इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. त्यावर केलेली शेवटची पोस्ट सुशांत सिंग राजपूत यांच्याशी संबंधित होती. रविवारी सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त त्याला श्रद्धांजली वाहताना अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक ‘रील’ पोस्ट केली होती, ज्यावर ‘इट्स अगेन १४ जून’ (पुन्हा १४ जून आला आहे) असे लिहिले होते.

२२ वर्षीय संचिता उगलेने १४ जून रोजी बेडरूममधील छताच्या पंख्याला गळफास लावून स्वतःचे आयुष्य संपवले. अभिनेत्री मृतावस्थेत नालासोपारा येथे निवासस्थानी आढळली. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. संचिता उगलेने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘कुमकुम भाग्य’ मालिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली.










