उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
शिरूर | नगर सह्याद्री
शिरूर शहरासह तालुक्यातील विविध भागांमध्ये रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, अचानक झालेल्या दमदार पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाच्या आगमनामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. शिरूर शहरातून बाबुरावनगरकडे जाणाऱ्या पुलाखालीही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पार्श्वभूमीवर नगरसेवक उमेश शेळके यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी तेथील पाण्याचा प्रवाह, येणाऱ्या-जाणाऱ्या पाण्याचा अंदाज घेत परिस्थितीची माहिती घेतली तसेच नागरिकांनी अनावश्यक गद करू नये आणि वाहतूक करताना काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरातील नागरिकांनीही पावसाचा मनमुराद आनंद घेतला. थंडगार वारा, ढगाळ वातावरण आणि उकाड्यापासून मिळालेला दिलासा यामुळे अनेकांनी पावसाचा आनंद लुटला. लहान मुलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
दुसरीकडे, शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी वर्गासाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला ओलावा जमिनीत निर्माण होण्यास मदत होणार असून पेरणी केलेल्या पिकांनाही या पावसाचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.










