मुंबई / नगर सह्याद्री –
बॉलिवूड अभिनेत्री आणि पर्यावरण प्रेमी दिया मिर्झा सध्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. हवामान बदल आणि पर्यावरण संकटासाठी पितृसत्ताक व्यवस्थेला जबाबदार ठरवणाऱ्या तिच्या विधानामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी तिच्या वक्तव्यावर टीका केली असून, त्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दिया मिर्झा ही अभिनेत्री असण्यासोबतच संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाची गुडविल अॅम्बेसेडर म्हणूनही कार्यरत आहे. अलीकडेच अभिनेत्री सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या दियाने हवामान बदलाच्या मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी बोलताना तिने हवामान बदलण्याच्या संकटामागील एक मोठे कारण म्हणजे पितृसत्ताक व्यवस्था असल्याचे म्हटले.

संवादादरम्यान दिया म्हणाली की, हवामान बदलाला चालना देणाऱ्या अनेक निर्णयांमध्ये पुरुषप्रधान व्यवस्थेचा मोठा प्रभाव आहे. त्यावर सोहा अली खानने ‘पुरुषी अहंकार’ हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर प्रतिक्रिया देताना दियाने सांगितले की, जगभरातील अनेक शोषणकारी आणि वर्चस्ववादी व्यवस्था हवामान बदलासाठी जबाबदार आहेत आणि या व्यवस्थांचे नेतृत्व प्रामुख्याने पुरुषांकडे राहिले आहे.
या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठली. अनेकांनी तिच्या विधानाला पुरुषांविरोधातील भूमिका असल्याचे म्हटले. वाढत्या ट्रोलिंगनंतर दियाने सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करत आपला मुद्दा स्पष्ट केला. दिया म्हणाली की, हवामान बदल हे केवळ पर्यावरणीय संकट नसून ते सामाजिक आणि आर्थिक असमानतेशीही जोडलेले आहे. शतकानुशतके निसर्गाकडे केवळ साधन म्हणून पाहण्याची वृत्तीमुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे.

ती पुढे म्हणाली की, महिलांना आणि मुलींना हवामान बदलाचे परिणाम सर्वप्रथम आणि सर्वाधिक प्रमाणात भोगावे लागतात. पाणीटंचाई, अन्नसुरक्षेचा प्रश्न, विस्थापन आणि उपजीविकेचे नुकसान यांसारख्या समस्यांचा महिलांवर अधिक परिणाम होतो. मात्र पर्यावरणविषयक निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग अद्यापही मर्यादित आहे.










