उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली | वृत्तसंस्था –
भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाणारा ठरला आहे. हैदराबादच्या मस्कायरूट एरोस्पेसफ कंपनीने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारताचे पहिले खाजगी ऑर्बिटल-क्लास रॉकेट विक्रम-1 चे यशस्वी प्रक्षेपण केले.
हैदराबादमधील स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीने शनिवारी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ऑर्बिटल-क्लास रॉकेट विक्रम-1 यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले. ऑर्बिटल-क्लास रॉकेट विक्रम-1 हे भारताचं पहिलं खाजगीरित्या विकसित केलेलं रॉकेट आहे. या अभियानाला आगमन असे नाव देण्यात आले आहे.
18 जुलै, शनिवारी ढगाळ हवामानात स्कायरूट विक्रम-1 च्या पहिल्या ऑर्बिटल प्रक्षेपणासाठी सज्ज झाले होते. रॉकेटचे उड्डाण सुरुवातीला सकाळी साडेअकरा वाजता होणार होते, परंतु ते पुढे ढकलून दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी करण्यात आले. स्कायरूटने सांगितले की, काल रात्रीच्या सर्व उड्डाणपूर्व चाचण्या आणि आज सकाळचे हवामान अनुकूल होते. परंतु, यामध्ये एक नियोजित थांबा घेण्यात आला.
या मोहिमेचा उद्देश विक्रम-1 ची कामगिरी आणि त्यामधील प्रमुख तंत्रज्ञानाची उड्डाणादरम्यान पडताळणी करणे हा आहे. स्कायरूटच्या मते, या चाचणीतून मिळणारा डेटा भविष्यातील मोहिमांना अधिक सुधारेल आणि नियमित प्रक्षेपण सुरू करण्यास मदत करेल. 18 नोव्हेंबर 2022 रोजी स्कायरूटने भारतीय भूमीवरून अंतराळात पोहोचणारे पहिलं खाजगी रॉकेट विक्रम-एस यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले होतेे. त्यानंतर जवळपास तीन वर्षांनी ही नवी कामगिरी झाली आहे.
विक्रम-1 काय आहे?
विक्रम-1 हे 24 मीटर उंच, तीन टप्प्यांचं ऑर्बिटल लाँच व्हीकल आहे. हे रॉकेट 350 किलो वजनापर्यंतचे पेलोड्स 60-डिग्री झुकलेल्या 450 किमीच्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये नेण्यास सक्षम आहे. या पहिल्या मोहिमेत एक ऑर्बिटल डजस्टमेंट मॉड्युलफ देखील समाविष्ट आहे, जे प्रक्षेपणानंतर उपग्रहांना त्यांच्या नियुक्त कक्षेत स्थापित करू शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन
दरम्यान, या संपूर्ण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष होते. प्रक्षेपण यशस्वी झाल्यानंतर मोदींनी संवाद साधला. ते म्हणाले, देशातील तरुणांना प्रेरणा देणारी घटना आहे. मी सर्व हा कार्यक्रम बघत होतो. तुमच्या पूर्ण टीमला पाहत होतो. तुमच्या टीमचे, युवाटीमचे अभिनंदन करतो. देशातील तरुणांवर विश्वास ठेवायला हवा. तुम्ही करुन दाखवले. मिशन आगमन आगमनला आणखी पुढे न्यायचे आहे. आत्मनिर्भर भारत हे हसण्यावरी नेत होते. आणि तुमच्या टीमने हे आत्मनिर्भर भारत हे करुन दाखवले आहे.










