सुजित झावरे पाटलांचे आ. काशिनाथ दातेंना खुले आव्हान
पारनेर | नगर सह्याद्री
ज्याने काम केले, त्याचे श्रेय त्याला मिळालेच पाहिजे. ज्यांना सात-आठ वर्षांत जमले नाही, ते काम आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करून आणले. आमदार काशिनाथ दाते यांनी उधारीच्या आमदारकीवर जगू नये, ताकद असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवून दाखवा, अशा शब्दांत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांनी आमदार काशिनाथ दाते यांचे नाव न घेता तोफ डागली. पारनेरच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळवून दिल्याबद्दल झावरे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना झावरे पाटील यांनी तालुयातील श्रेयवादाच्या लढाईवर सडेतोड भाष्य केले.
झावरे पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारनेरमधील प्रवेश सोहळ्यात डीपीआर मंजुरीचे आश्वासन दिले होते. आचारसंहितेमुळे या कामाला विलंब झाला, मात्र पाठपुरावा करून मी ही फाईल मार्गी लावली. मी सोशल मीडियावर पीडीएफ टाकली तर आमदारांच्या पोटात गोळा आला. त्यांना डीपीआर मंजूर झाल्याचा आनंद नाही, तर तो सुजित झावरे यांनी मंजूर केला याचे दुःख आहे. ज्यांना साधे ग्रामपंचायत सदस्य होण्याची लायकी नाही, त्यांना स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या सांगण्यावरून आम्ही मदत केली आणि आमदार केले. आज तेच उपकाराची भाषा विसरले आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
पारनेर शहराच्या पाणी योजनेबाबत बोलताना झावरे म्हणाले की, विकास आराखडा मंजूर नसल्याने पाणी योजनेत तांत्रिक अडचणी येत होत्या. आता तो मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काळात मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पारनेरकरांच्या सेवेत ही पाणी योजना कार्यान्वित करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी नगराध्यक्ष अशोक चेडे यांच्यावरही टीका केली. चेडे यांना डीपीआरचा लाँग फॉर्म तरी माहिती आहे का? कोरोना काळात चढ्या भावाने माल विकणार्या वृत्तीचा वापर करून आमदार आपली पोळी भाजून घेत आहेत. येणार्या नगरपंचायत निवडणुकीत जनताच त्यांना चोख उत्तर देईल, असा इशारा झावरे यांनी दिला.माजी आमदार विजय औटी यांनी कधीही खालच्या पातळीवर टीका केली नाही. दुसर्याच्या कामाचे श्रेय घेतले नाही, असेही झावरे म्हणाले.
गोड बोलणारा अन् मनात विष असणारा माणूस
आमदार दाते यांचा उल्लेख ‘गोड बोलणारा पण मनात विष असलेला माणूस’ असा करत झावरे पाटील यांनी संताप व्यक्त केला. निवडणुकीच्या काळात ग्रामपंचायत सदस्य नसलेले हे माझ्या पाया पडायला येत होते. विधानसभा निवडणुकीत ज्यांच्याकडे १०-१५ गावांत बुथ लावायला माणसे नव्हती, त्यांची व्यवस्था आम्ही केली. आम्ही एका विषारी झाडाला पाणी घातले, याची आज खंत वाटते, असेही ते म्हणाले.










