पारनेर वनविभागाची कारवाई
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील काळकूप येथे विनापरवाना वृक्षतोड करून त्यापासून कोळसा तयार करण्याचा प्रकार वनविभागाच्या तपासात उघडकीस आला असून संबंधित शेतमालकाविरुद्ध महाराष्ट्र खासगी वृक्षतोड अधिनियम, 1964 अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
काळकूप येथील गट क्रमांक 44 मधील शेताच्या बांधावर असलेल्या बाभूळ, सुबाभूळ आणि कडुनिंब या प्रजातींच्या झाडांची आवश्यक शासकीय परवानगी न घेता तोड करण्यात आली होती. या झाडांची तोड करून त्यापासून कोळसा तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर संबंधित ठिकाणी पाहणी करण्यात आली. तपासादरम्यान वृक्षतोड झाल्याचे निष्पन्न झाले.
प्राथमिक चौकशीत या झाडांचा वापर कोळसा निर्मितीसाठी करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित शेतमालक लक्ष्मण शंकर खरमाळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र खाजगी वृक्षतोड अधिनियम, 1964 नुसार कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संबंधितांकडून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय समतोल बिघडतो, भूजल पातळीवर परिणाम होतो तसेच जैवविविधतेलाही धोका निर्माण होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करण्यापूव संबंधित विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा प्रकरणांवर वनविभागाची विशेष नजर राहणार आहे.ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी जी. व्ही. धाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. एन. भालेकर, वनपाल आर. एस. देवकर, वनरक्षक एन. बी. बढे आणि वनरक्षक बी. एस. दवने यांनी संयुक्तपणे केली. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.










